फिनलंड मधील शिक्षण पद्धती आणि भारत
फिनलंड मधील शिक्षण पद्धती ही समस्या निराकरण, उद्योजकता आणि कौशल्य यावर आधारलेले आहे. तर भारतीय शिक्षण पद्धती ही घोकंपट्टी, पुस्तकिपना आणि आशय यावर आधारलेली आहे. प्रा. लीला पाटील यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की, साचेबद्धपणा आणि पुस्तकीपणा हा भारतीय शिक्षणाला लागलेला शाप आहे. खरंतर महात्मा गांधी यांनी 1937 मध्ये त्यांच्या 'नई तालीम' या शिक्षण विचारातून उद्योग केंद्री शिक्षणाचा विचार मांडला होता. परंतु भारतीय धोरणकर्त्यांनी आणि समाजाने हा विचार नाकारला व नई तलीमच्या शाळा बंद पडू लागल्या. म्हणजेच फिनलंडने 1970 नंतर जो दृष्टिकोन अंगीकारला तो भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला होता.
फिनलंड आणि भारतीय शिक्षणाची तुलना करताना शिक्षकांची गुणवत्ता हा मला कळीचा मुद्दा वाटतो. फिनलंड प्रत्येक शिक्षकाला पाच वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. परंतु भारतामध्ये एक किंवा दोन वर्षाचे शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम आहेत. आणि त्या ठिकाणी चाललेला अभ्यासक्रम हा अत्यंत कालबाह्य आहे. शिक्षण शास्त्र महाविद्यालयांची गुणवत्ता भारतामध्ये अत्यंत खालावलेली आहे असे वाटते. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या 'शोध नव्या युगाचा' या पुस्तकामध्ये तर "शिक्षकांची संख्या आणि गुणवत्ता ही आपले राष्ट्रीय संकट म्हणून घोषित करावे" असे म्हटले आहे.
फिनलंड मधील शिक्षण हे खासगीकरणाकडे कडून सार्वजनिकरनाकडे वाटचाल करत आहे तर, भारतामध्ये याच्या उलट परिस्थिती असून भारताने सर्वजनिकरणाकडून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. भारतीय सरकार शिक्षणातील खासगीकरणाला अनुकूल धोरण आखत आहे. भारतामध्ये सरकारी शाळा या बंद पडत आहेत किंवा त्यामध्ये पालक आपल्या मुले प्रवेश घेत नाहीत आणि खाजगी शिक्षण संस्थांचा बाजार मांडला आहे.
1970 नंतर फिनलंडने तेथील शिक्षण पद्धतीचे योग्य विश्लेषण केले, नियोजन केले आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली त्यामुळे त्याचे फलित त्यांना सध्या मिळत आहे. परंतु, भारतामध्ये विश्लेषण केले जाते, नियोजन केले जाते, निर्णय घेतले जातात परंतु, शेवटच्या पायरीला म्हणजे अंमलबजावणीला मात्र व्यवस्था कमी पडतो. (नवीन शैक्षणिक धोरण याला अपवाद ठरेल अशी अपेक्षा)
फिनलंड मधील शिक्षण पद्धती मध्ये विद्यार्थी स्वतःचे नियम स्वतः बनवितात. परंतु, भारतामध्ये प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांवर लादली जाते. कुठल्याही निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात नाही. आणि शिस्तीच्या नावाखाली धाक, दडपशाही याचा अतिरेक केला जातो. शिक्षक हा शाळेतील ‘ हुकूमशहा’ सारखा वागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता (Creativity) आणि नाविन्यता (Innovation) याचा विकास होण्यास खूप मर्यादा येतात.
फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा हि भारतीय शिक्षणाची ग्रहीतके आहेत.
शिक्षण तज्ञ रमेश पानसे सर यांनी असे म्हटले आहे की, ज्ञान देणारी शिक्षण व्यवस्था बंद करून आता विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवायला शिकविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागेल. शिक्षकच फक्त मुलांना शिकवू शकतो हा संकुचित दृष्टिकोन आता मागे पडला आहे. संधी दिली तर मुलं स्वतःसुद्धा शिकतात, परस्परांकडून शिकतात.
भारतामधील शिक्षणपद्धती मध्ये काही प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शाळा, संस्था, शिक्षक नक्कीच चांगले कार्य करत आहेत परंतु, त्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा नवीन शैक्षणिक धोरणात दूर होतील अशी अशा करूया.
शरद आहेर,
प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे
मो. ९८९००२५२६६
sharadaher3@gmail.com
No comments:
Post a Comment