Sunday, January 10, 2021

एक झपाटलेला: शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक


 भारतीय शिक्षण आणि समाज व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि खेळ हा अत्यंत दुर्लक्षित आणि प्राधान्यक्रम नसलेला असा विषय आहे. सोयी-सुविधांचा अभाव, इतर विषय शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांचा दृष्टिकोन, बदलती शासकीय धोरण अशा एक ना अनेक समस्या सध्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या विषयाला भेडसावत आहेत. असे म्हटले जाते की, "Be a part of answer NOT a question." म्हणजे "उत्तराचा भाग बना, प्रश्नाचा नाही" या वाक्याप्रमाणे काही व्यक्ती आजूबाजूला असलेल्या प्रश्‍नांच्या आणि समस्यांच्या गर्दीत अथवा चर्चेत वेळ न घालवता आपल्या परीने या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींपैकीच एक म्हणजे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या गावांमधील एमजीएम कॉलेजचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची संक्षिप्त सांख्यिकी माहिती पुढीलप्रमाणे 

१. आत्तापर्यंत आंतर महाविद्यालयीन स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांच्या महाविद्यालयातील 302 खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळात प्रतिनिधित्व केले आहे.

२. महाविद्यालयांमध्ये आंतर महाविद्यालयीन स्तरापासून अंतर विद्यापीठ स्तरापर्यंत आत्तापर्यंत 132 स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.

३. आत्तापर्यंत विद्यापीठ, राज्य सरकार आणि  भारत सरकार मार्फत २ कोटी 98 लाख रुपयाचे अनुदान मिळविले आहेे.

४. २०१५ मध्ये  क्रीडा महोत्सव (अश्वमेध) स्पर्धेचे यशस्वी आयोजन ज्यामध्ये 4000 हजार खेळाडू व पाच खेळाचा समावेश होता.

या मधूनच एकूण 3 इनडोअर स्टेडियम, ४ बास्केट बॉल ग्राउंड, ४ हॉलीबॉल ग्राउंड, ४ कबड्डी ग्राउंड, 4 खो खो ग्राउंड, १ नेट बॉल, १ हँडबॉल, १ बॉल बॅडमिंटन आणि २००  मीटरचा ट्रॅक अशा प्रकारच्या सोयीसुविधा सरांनी एमजीएम महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या आहेत. 

या सांख्यिकी माहितीचे वेगळ्या प्रकारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, मनोज रेड्डी सरांची आत्तापर्यंत एकूण 18 वर्षाची सेवा झालेली आहे. या सेवेमध्ये त्यांचे दर वर्षी सरासरी १७ खेळाडू वेगवेगळ्या स्तरावर खेळलेले आहेत, दर वर्षी सरासरी ७ स्पर्धांचे आयोजन केलेले आहे, तर दर वर्षी सरासरी १ मैदानाचा विकास केलेला आहे आणि दर वर्षी सरासरी १६ लाख ५५ हजार इतके अनुदान शासनामार्फत मिळविलेले आहे.

हे सर्व केवळ सांख्यिकी आकडे नाही तर स्पर्धांचे आयोजन असो की, मैदानांचा विकास असो या प्रत्येक बाबींमध्ये गुणवत्ता घसरणार नाही याची काळजी सर नेहमीच घेतात. त्यामुळेच अहमदपूर मध्ये स्पर्धांचे आयोजन असते तेव्हा संपूर्ण गावांमध्ये एक वेगळाच उत्साह, ऊर्जा आणि वातावरण निर्मिती झालेली असते. या स्पर्धा बघण्यासाठी अहमदपूर मध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी उसळते. असाच एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. 2011 यावर्षी एमजीएम महाविद्यालया मध्ये हँडबॉलच्या आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातील विविध विद्यापीठांचे ६५ मुलींचे आणि ७५ मुलांचे  संघ सहभागी होण्यासाठी आले होते. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या सर्व संघांची मिरवणूक संपूर्ण गावा मधून काढण्यात आलेली होती. ही मिरवणूक बघण्यासाठी संपूर्ण गावांमधून मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली होती. प्रत्येक चौकाचौकात खेळाडूंवर पुष्पवृष्टी होत होती, खेळाडूंना स्थानिक लोक उस्फूर्तपणे पुष्पगुच्छ देत होते, हार घालत होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला अहमदपूर मधील हा पाहुणचार म्हणजे अतिशय सुखद अनुभव होता. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशामध्ये हँडबॉल सारख्या खेळालाही इतकी समाजमान्यता निर्माण होण्यामध्ये मनोज रेड्डी यांचा सिंहाचा वाटा आहे. 

याबरोबरच सरांनी चार वर्षे विद्यापीठामध्ये क्रीडा संचालक म्हणून कार्य करताना आणि महाविद्यालयांमध्ये कार्य करताना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले ते पुढीलप्रमाणे

१. विद्यापीठामध्ये स्पर्धा आयोजनांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग केला त्यामुळे खेळाडू, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांमध्ये संवाद आणि समन्वय प्रस्थापित झाला

२. खेळाडूंना स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो हे ओळखून सरांनी प्रत्येक संघासाठी रेल्वेचे आरक्षण करूनच प्रवास करेल याकडे लक्ष पुरविले.

३. वेगवेगळ्या संघांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आणि त्या प्रशिक्षण शिबिरांसाठी भारतातील नामवंत मार्गदर्शकांना निमंत्रित केले. 


या संपूर्ण कार्यामध्ये यशस्वी होण्यामागे मनोज रेड्डी यांची स्वभाव वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये नवीन रुजू झालेल्या शिक्षकांसाठी ही स्वभाववैशिष्ट्ये मार्गदर्शक ठरू शकतील असे वाटते ती पुढील प्रमाणे.

१. कमी बोलणे आणि कृतीवर लक्ष केंद्रित करणे

२. संस्थाचालकांपासून शिपायापर्यंत, गावातील प्रतिष्ठित व्यक्तीपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांशीच मनोज रेड्डी यांचे संबंध आणि नेटवर्किंग अतिशय चांगले आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यामध्ये त्यांना सर्वांचाच पाठिंबा आणि सहकार्य लाभते.

३. कोणतेही कार्य करत असताना ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आवश्यक तो पाठपुरावा (Follow up) करणे हे त्यांचे महत्त्वाचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. 

४. प्रामाणिक, निस्वार्थी आणि विनम्र स्वभावामुळे सगळ्यांचाच विश्वास संपादन केला.

५. उत्तमता (Excellence) आणि गुणवत्ता (Quality) यालाच प्राधान्य देतात 


तळागाळात अशाच झपाटून काम करणाऱ्या, क्रीडा संस्कृती निर्माण करणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांची आज शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला अत्यंत आवश्यकता आहे. 


शरद आहेर 

मो. ९८९००२५२६६ 


Saturday, January 9, 2021

फिनलंड मधील शिक्षण पद्धती आणि भारत 

 फिनलंड मधील शिक्षण पद्धती आणि भारत 

फिनलंड मधील शिक्षण पद्धती ही समस्या निराकरण, उद्योजकता आणि कौशल्य यावर आधारलेले आहे. तर भारतीय शिक्षण पद्धती ही घोकंपट्टी, पुस्तकिपना आणि आशय यावर आधारलेली आहे. प्रा. लीला पाटील यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की, साचेबद्धपणा आणि पुस्तकीपणा हा भारतीय शिक्षणाला लागलेला शाप आहे. खरंतर महात्मा गांधी यांनी 1937 मध्ये त्यांच्या 'नई तालीम' या शिक्षण विचारातून उद्योग केंद्री शिक्षणाचा विचार मांडला होता. परंतु भारतीय धोरणकर्त्यांनी आणि समाजाने हा विचार नाकारला व नई तलीमच्या शाळा बंद पडू लागल्या. म्हणजेच फिनलंडने 1970 नंतर जो दृष्टिकोन अंगीकारला तो भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला होता. 

फिनलंड आणि भारतीय शिक्षणाची तुलना करताना शिक्षकांची गुणवत्ता हा मला कळीचा मुद्दा वाटतो. फिनलंड प्रत्येक शिक्षकाला पाच वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. परंतु भारतामध्ये एक किंवा दोन वर्षाचे शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम आहेत. आणि त्या ठिकाणी चाललेला अभ्यासक्रम हा अत्यंत कालबाह्य आहे. शिक्षण शास्त्र महाविद्यालयांची गुणवत्ता भारतामध्ये अत्यंत खालावलेली आहे असे वाटते. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या 'शोध नव्या युगाचा' या पुस्तकामध्ये तर "शिक्षकांची संख्या आणि गुणवत्ता ही आपले राष्ट्रीय संकट म्हणून घोषित करावे" असे म्हटले आहे.

फिनलंड मधील शिक्षण हे खासगीकरणाकडे कडून सार्वजनिकरनाकडे वाटचाल करत आहे तर, भारतामध्ये याच्या उलट परिस्थिती असून भारताने सर्वजनिकरणाकडून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. भारतीय सरकार शिक्षणातील खासगीकरणाला अनुकूल धोरण आखत आहे. भारतामध्ये सरकारी शाळा या बंद पडत आहेत किंवा त्यामध्ये पालक आपल्या मुले प्रवेश घेत नाहीत आणि खाजगी शिक्षण संस्थांचा बाजार मांडला आहे. 

1970 नंतर फिनलंडने तेथील शिक्षण पद्धतीचे योग्य विश्लेषण केले, नियोजन केले आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली त्यामुळे त्याचे फलित त्यांना सध्या मिळत आहे. परंतु, भारतामध्ये विश्लेषण केले जाते, नियोजन केले जाते, निर्णय घेतले जातात परंतु, शेवटच्या पायरीला म्हणजे अंमलबजावणीला मात्र व्यवस्था कमी पडतो. (नवीन शैक्षणिक धोरण याला अपवाद ठरेल अशी अपेक्षा)

फिनलंड मधील शिक्षण पद्धती मध्ये विद्यार्थी स्वतःचे नियम स्वतः बनवितात. परंतु, भारतामध्ये प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांवर लादली जाते. कुठल्याही निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात नाही. आणि शिस्तीच्या नावाखाली धाक, दडपशाही याचा अतिरेक केला जातो. शिक्षक हा शाळेतील ‘ हुकूमशहा’ सारखा वागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता (Creativity) आणि नाविन्यता (Innovation) याचा विकास होण्यास खूप मर्यादा येतात.

फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा हि भारतीय शिक्षणाची ग्रहीतके आहेत. 

शिक्षण तज्ञ रमेश पानसे सर यांनी असे म्हटले आहे की, ज्ञान देणारी शिक्षण व्यवस्था बंद करून आता विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवायला शिकविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागेल. शिक्षकच फक्त मुलांना शिकवू शकतो हा संकुचित दृष्टिकोन आता मागे पडला आहे. संधी दिली तर मुलं स्वतःसुद्धा शिकतात, परस्परांकडून शिकतात. 

भारतामधील शिक्षणपद्धती मध्ये काही प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शाळा, संस्था, शिक्षक नक्कीच चांगले कार्य करत आहेत परंतु, त्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा नवीन शैक्षणिक धोरणात दूर होतील अशी अशा करूया.


शरद आहेर, 

प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे 

मो. ९८९००२५२६६

sharadaher3@gmail.com


'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...