Thursday, September 15, 2022

शारीरिक शिक्षण अभासक्रम कसा असावा?


 शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा असावा याबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच मतांतरे आहेत. तसेच भारतातील शैक्षणिक संरचनेचा विचार करता प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत अभ्यासक्रमाची रचना कशी असावी याबद्दल विविध बोर्डचा वेगवेगळा अप्रोच, मार्ग आहे. उदिष्टे, सोईसुविधा,स्थानिक संस्कृती इ विविध घटकांनुसार अभ्यासक्रम वेगवेगळा असू शकतो. तरीसुध्दा शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या स्तरावर कसा विकसित होत जावा यासाठी pangrazi या शारीरिक शिक्षणातील तज्ञाने एक रचना मांडली आहे व ती डायमंड सारख्या आकृतीत मांडली आहे म्हणून त्याला डायमंड कल्पनाबंध असे संबोधले जाते. 

डायमंडची सुरुवात तळातील एका बिंदूपासून होते व तो वरच्या बाजूस रुंदावत जातो. या आकाराचा मतितार्थ असा आहे की, अगदी सुरुवातीच्या शालेय स्तरावर एखाद दुसरे कौशल्य अथवा संकल्पनांचा परिचय करत जावे व जसे विद्यार्थी शिकत जातील तसतसे अधिक कौशल्य व संकल्पना समाविष्ट कराव्या. आपण जसे डायमंड वर, वर सरकु तसा आपण प्राथमिक शालेय स्तरावर प्रवास करत जातो. वरच्या वर्गात प्रवेश झाल्यावर अधिक कौशल्य, संकल्पनांचा शिक्षक परिचय करून देतात. विद्यार्थी जसजसे नवीन संकल्पना अथवा ज्ञान आत्मसात करत जातील तसतसे अधिक ज्ञान कौशल्य संकल्पना शिकविल्या जाव्यात असे या डायमंडच्या तळाचा आकार दर्शवितो.

सुरुवातीच्या काळात म्हणजेच पूर्व प्राथमिक स्तरावर मूलभूत कारक कौशल्य आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना द्यावी. त्यालाच आकृतीत पायाभरणी (Building the foundation) असे म्हटले आहे. यामध्ये विविध उपक्रम अथवा खेळ खेळण्यासाठी आवश्यक चालणे, धावणे, उड्या मारणे, वळणे, कॅच करणे, थ्रो करणे, ढकलणे, ओढणे, हिट करणे, ड्रिबल करणे अशा विविध मूलभूत कौशल्यांचे अध्यापन या स्तरावर करणे अपेक्षित आहे. जेणेकरून पाया भक्कम होऊन विद्यार्थी विविध शारीरिक उपक्रम करू शकतील आणी त्यांचा आनंद पुढील जीवनात घेऊ शकतील. 

त्यानंतर आपण डायमंडच्या सर्वात रुंद अशा मध्यावर म्हणजेच  प्राथमिक व माध्यमिक स्तरावर पोहोचतो त्यावेळी आपला विद्यार्थी विविध खेळांची ओळख करून घेण्यासाठी अनेक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी सज्ज झालेला असतो. या  स्तरावर  विद्यार्थ्यांना खूप उपक्रम, खेळ शिकवावेत. सर्व विद्यार्थ्यांना एकच खेळ आवडेल असे नाही तर, प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना विविध खेळांची अथवा उपक्रमांची ओळख करून दिल्यास विद्यार्थी त्यांच्या भावी जीवनात सक्रिय राहण्याची शक्यता वाढते. त्यालाच वरील आकृतीत Sampling the Menu असे संबोधले आहे. म्हणजे ज्या प्रमाणे हॉटेलमधे गेल्यानंतर मेनूकार्ड दाखविले जाते आणि आपल्याला हवा त्या पदार्थाची निवड आपण करतो त्या रीतीने शारीरिक शिक्षणाच्या तासात विद्यार्थ्यांना विविध उपक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले (Choice) तर विद्यार्थी आनंदाने उपक्रमात सहभागी होतील. शालेय स्तरावर विविध उपक्रम शिकल्यास आपल्याला कोणता उपक्रम आवडतो, जमतो हे विद्यार्थ्याला समजेल उदा. विविध वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ, रॅकेट स्पोर्ट इ 

आपला डायमंड वरील प्रवास जसा वरच्या दिशेने सरकतो तसा विद्यार्थी माध्यमिक ते उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विविध उपक्रमांतून विशिष्ट उपक्रमाची, खेळाची निवड करावी त्यालाच आकृतीत मार्ग निवड (Choosing the Path) असे संबोधले आहे. आता या अरुंद डायमंडचा आकार पुन्हा निमुळता होत जातो या स्तरावर निर्णयक्षमता, समस्या निराकरण क्षमता, स्व व्यवस्थापन क्षमता इत्यादी विकसित होऊन विद्यार्थी निवडक उपक्रमात पारंगत होऊन काही उपक्रम आजीवन करण्यासाठी तयार होणे अपेक्षित आहेडायमंडचा हा निमुळता आकार काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे, विविध पर्यायातून सुयोग्य निवड करणे, निवडक गोष्टी उपक्रमात प्राविण्य मिळवणे व त्यासाठी अथक परिश्रम करणे व त्याचे पर्यावसन आजीवन शारीरिक उपक्रम सहभाग घेण्यात होते हे दर्शवितो. या स्तरावर विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या काही उपक्रमांमध्ये आत्मविश्वासाने सहभाग घेतील आणि प्रावीण्य प्राप्त करतील.

अशा प्रकारच्या प्रक्रियेमधून जर विद्यार्थी गेला तर तो आजीवन सक्रिय राहण्याची शक्यता वाढते शारीरिक साक्षरतेचे प्रमाण वाढेल, शारीरिक शिक्षणाने सुशिक्षित व्यक्ती घडण्यासाठी पोषक वातावरण मिळेल. डायमंड कल्पना आकृतीबंध हा अभ्यासक्रम कसा असावा यावरील अंतिम उत्तर नाही परंतू तो मार्गदर्शक आहे, तर्कशुध्द आहे आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. 



Thursday, March 17, 2022

लिहितं होऊ या!

 तीन-चार वर्षांपूर्वी "शिक्षकांसाठी साने गुरुजी" हे हेरंभ कुलकर्णी यांचे पुस्तक वाचत होतो. या पुस्तकात साने गुरुजी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूबद्दल सविस्तर विवेचन केलेले आहे. सानेगुरुजी सर्वांनाच एक संवेदनशील शिक्षक म्हणून परिचित आहे. त्याचबरोबर साहित्यिक म्हणून साने गुरुजीचे कार्य खूप मोठे आहे आणि ते या पुस्तकात सविस्तर मांडलेले आहे जे अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातील एका पानावर मी जे वाचलं त्याने मला खूप अंतर्मुख केले, प्रेरित केले आणि माझ्या धारणा त्यामुळे बदलून गेल्या.




ते म्हणजे "As you write personal and personal it becomes universal and universal". या अर्थाने आपण जितके आपले व्यक्तिगत अनुभव मांडत राहू तितके ते जगाला आपले वाटत असतात. लेखन म्हणजे अशी काही अशक्यप्राय गोष्ट नाही. आपणही सहज लिहू शकतो, असा साधारण आशय या पानावर होता. त्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला होता. तितक्यातच मी माझ्या मुलीला स्पर्धेसाठी एका शाळेमध्ये घेऊन गेलो. त्या ठिकाणी मला खूप चांगला अनुभव आला किंबहुना मी भारावून गेलो होतो. पुस्तकातील या ओळी माझ्या डोक्यात घर करून राहिलेल्या होत्याच. त्या ठिकाणी मी लगेच ते अनुभव मोबाईलवर लिहून काढले जसं सुचेल तसे लिहित गेलो. त्या क्षणी जे अनुभवले, ज्या भावना मनात येत होत्या त्या लिहित गेलो. लिहून झाल्यानंतर मन खूप हलक वाटत होतं. जणूकाही खूप जवळच्या मित्राला तो अनुभव सांगितला होता. असं म्हणतात ना ! की, लेखन म्हणजे संवाद असतो पेनाचा कागदाशी आणि स्वतःचा स्वतःशी हा अनुभव मी प्रथमच घेत होतो. लिहिलेला अनुभव मी व्हॉट्स ॲपवर शेअर केला. काहींनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मला या अनुभवाने आत्मविशवास दिला की, मी पण लिहू शकतो. त्यानंतर मी सुचेल ते लिहित आहे, आलेले अनुभव लिहित आहे. मला वाटायचं आपण फक्त खेळू शकतो,व्यायाम करू शकतो पण लेखन हा आपला प्रांत नाही. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या बहुतांश व्यक्तींना साधारणपणे असाच न्यूनगंड असतो किंबहुना तसे वातावरण, प्रेरणा नसतात. तोत्तोचान, टू सर विथ लव्ह, टीचर ही पुस्तकांत शिक्षकांनी आपले वैयक्तिक अनुभव अत्यंत सहज भाषेत माडले आणि आज ही पुस्तकं जगप्रसिद्ध आहे. आपण सर्वच दैनंदिन जीवनात विविध अनुभव घेतो, काही घटना, प्रसंग घडतात हे आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला असं वाटतं की, आपल्या अनुभवात काय विशेष आहे? हे अनुभव सर्वच घेतात.पण असं नसतं. आपले अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी असू शकतील. 

आज शेती, उद्योग, शिक्षण तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांमध्ये विपुल आणि सकस असे साहित्य उपलब्ध आहे. परंतू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात असे साहित्य उपलब्ध नाही याची खंत वाटते. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात जे काही साहित्य उपलब्ध आहेत ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहचतच नाही. विनोबा म्हणतात की,विज्ञान जोपर्यंत मातृभाषेतून मिळत नाही तोपर्यंत ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. हे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रासाठी पूर्णपणे लागू होते कारण, शारीरिक शिक्षणाचे विपुल साहित्य इंग्रजीत उपलब्ध आहे परंतु ते मराठीत नसल्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहतचत नाही. विनोबा पुढे म्हणतात की, सुशिक्षित लोक आपल्या भाषेत विज्ञान नाही अशी ओरड करतात त्याऐवजी विज्ञान आपल्या भाषेत आणण्यास काहीतरी योगदान करावे. इंग्रजीत चांगली पुस्तके आहेत ती सर्व आपल्या भाषेत आणली पाहिजेत. परंतु यासंबंधी कोणी विचारच करत नाहीत. खरे पाहता ज्यांनी स्वतः इंग्रजीचे ज्ञान मिळविले त्यांनी व्रत घेतले पाहिजे की मी मरण्यापूर्वी एका चांगल्या इंग्रजी पुस्तकाचा माझ्या मातृभाषेत अनुवाद करीन. असा अनुवाद केल्याशिवाय मला मारण्याचा अधिकार नाही. 

असे म्हणतात की,‘एखादा प्रश्न जर सुटायचा असेल तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते त्यामुळे तो प्रश्न सुटायला मदत होते.’ म्हणूनच मनापासून वाटते की, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी चांगले साहित्य निर्माण होणे, लेखक आणि वाचकांची एक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. चला तर लिहितं होऊ या! व्यक्त होऊ या!


संदर्भ

शिक्षकांसाठी साने गुरुजी. हेरंब कुलकर्णी

ज्ञान ते सांगतो पुन्हा. विनोबा भावे



'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...