Tuesday, February 16, 2021

व्याकरण ते अंतःकरण !!! 


 

व्याकरण ते अंतःकरण !!! 


उस्मनाबाद जिल्ह्यातील चिंचपूर या छोट्याशा गावातील अन्सार शेख सर हे हिंदी विषयाचे शिक्षक. परंतु शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कबड्डी खेळलेले असल्यामुळे मनाच्या कोपऱ्यात कबड्डी विषयाचे प्रेम होतेच. दिवसभर शाळेमध्ये हिंदी विषयाचे अध्यापन झाल्यानंतर अन्सार सर सायंकाळी 7 ते 9 कबड्डीच्या मैदानावर येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागली आणि मुलांबरोबर मुलीही सरावाला येऊ लागल्या. सरांच्या मार्गदर्शनाखाली 14,16 आणि 17 वर्षाखालील मुल व मुलींचे संघ जिल्हा आणि राज्यस्तरावर चांगले कार्यमान करून लक्ष वेधून लागले. मैदानावर येणार्‍या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगले नसल्यामुळे बाहेरगावी खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी सर्व खर्च अन्सार सर स्वतः करतात. ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे महत्व पटवून देऊन त्यात मिळणाऱ्या संधी काय काय आहेत याची विशेष माहिती करून देण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो. आत्तापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर एक मुलगी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाली. या आकडेवारीकडे पाहिल्यानंतर कदाचित विशेष काही वाटणार नाही परंतु, ज्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि हे विद्यार्थीही खेळतात ते कुठल्याही संख्याशास्त्रीय विश्लेषणा पलिकडचे आहे असे वाटते. कारण,  शाळेत बहुतांशी विद्यार्थी गरीब कुटुंबातील,बिगारी कामगार,ऊसतोड कामगारांची आहेत. त्यामुळे त्यांचे आई वडील सहसा कामानिमित्त जास्त वेळ बाहेरच असतात,त्यामुळे ही मुलं आजी, आजोबा किंवा नातेवाईकांकडे असतात. परिणामी घरी लक्ष द्यायला कुणी नसल्यामुळे मुल वाईट मार्गाला किंवा इतर ठिकाणी भटकू नयेत म्हणून शेख सर विशेष लक्ष देतात. वेळप्रसंगी त्यांचा अभ्यास घेणे, आर्थिक मदत करणे ही कामे सर करताना दिसून येतात.त्यांच्या या कार्यात त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांची मदत नेहमी असते,क्लासमेंट्स नावाचा माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप सरांकडे जमेल तेवढे पैसे देऊन सरांच्या कार्याला हातभार लावतात.गावातील सर्व क्षेत्रातील व्यक्तीसुद्धा त्यांच्या कामात सहकार्य करतात. 

या विद्यार्थ्यांना केवळ कबड्डीच्या मैदानावरच स्पर्धा करावी लागत नसून जीवनाच्या मैदानावरही त्यांना दररोज स्पर्धा करावी लागते. आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांना भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शन असते ते अन्सार सरांचे. 

अन्सार सर विद्यार्थ्यांना केवळ कबड्डीचेच धडे देत नाही तर ज्याप्रमाणे हिंदी चे व्याकरण सुधारण्यासाठी वर्गामध्ये प्रयत्न करतात तसेच विद्यार्थ्यांचे अंतकरण सुधारण्यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करतात. त्यासाठी सरांनी घरामध्येच छोटे ग्रंथालय सुरू केले आहेत. या ग्रंथालयात विविध प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला सर आवर्जून पुस्तक भेट म्हणून देतात आणि विद्यार्थ्यांना अवांतर वाचनास प्रेरित करतात. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी विविध विषयावर लेखन तसेच कविता करू लागले आहे. 


 हे सगळे कार्य करण्यामागची तुमची प्रेरणा काय आहे किंवा तुम्ही हे का करता? या प्रश्नावर सर म्हणाले की "कबड्डी हे माझे पॅशन आहे आणि कबड्डीच्या मैदानावर मला आनंद मिळतो जो मला इतर कुठेही मिळत नाही" म्हणून मी हे सर्व कार्य करतो.  "आपल्याला काय पाहिजे ते पाहू नका, मुलांना काय पाहिजे ते ओळखा आणि त्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करा"असे सरांचे नेहमी म्हणणे असते.  

असे म्हणतात की, " शिक्षक हुशार असण्याबरोबरच संवेदनशील आणि उत्तरदायी असनंच जास्त महत्त्वाचे आहे"  या वाक्याचा प्रत्यय सरांच्या कार्याकडे पाहून येतो. समाजामध्ये आत्मकेंद्रीपणा वाढत असताना अन्सार सरांसारखे शिक्षक इतर  शिक्षकांना अंतर्मुख आणि  प्रेरित करतात. सरांच्या या कार्याला सलाम!!!

नाव - अन्सार शेख

मो. 9657584171


लेखन 

युवराज देवकर : ७७७४८०११७६

 शरद आहेर : ९८९००२५२६६


    


Monday, February 8, 2021

शारीरिक शिक्षणाच्या वेळेचे गणित......

 


शारीरिक शिक्षणाच्या वेळेचे गणित......

शारीरिक शिक्षण हा अभ्यासक्रमतील असा एकमेव  विषय आहे जो 21 व्या शतकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये (Creativity, Critical thinking, Collaboration and Communication) वाढविण्यासाठीचे  एक प्रवेशद्वार आहे. शारिरीक सक्रियतेने मध्ये आजीवन सहभागाचा प्रवेश बिंदू म्हणजे शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण केवळ अभ्यासक्रमातीलच नव्हे तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा विषय असतानाही शारीरिक शिक्षणासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये किती वेळ दिला जातो ? यासंबंधी जगभरात झालेल्या संशोधनातील काही प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे 

  • संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) यांच्या मार्गदर्शकानुसार गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण राबविण्यासाठी आठवड्यामध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी १२० मिनिटे इतका वेळ द्यायला पाहिजे.
  • प्राथमिक शाळेमध्ये दर आठवड्याला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जगभरातील विविध खंडांमध्ये सरासरी किती वेळ दिला जातो तो पुढीलप्रमाणे: आफ्रिका ९७ मिनिट, अशिया  ८४ मिनिटे, युरोप १०९ मिनिटे आणि  अमेरिका १०७ मिनिटे.




  • माध्यमिक शाळेमध्ये दर आठवड्याला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जगभरातील विविध खंडांमध्ये सरासरी दिला जाणारा वेळ पुढील प्रमाणे: आफ्रिका ९६ मिनिट, अशिया  ८५ मिनिटे, युरोप १०५ मिनिटे आणि  अमेरिका १२५ मिनिटे.









या सगळ्या आकडेवारीचा विचार केल्यानंतर पुण्यामध्ये शारीरिक शिक्षण या विषयाला अभ्यासक्रमांमध्ये किती वेळ दिला जातो ?  यासंबंधी एक सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की, प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षणासाठी आठवड्याला सरासरी १२० मिनिटे वेळ दिला जातो तर, माध्यमिक स्तरावर सरासरी 117 मिनिटे वेळ दिला जातो. ही आकडेवारी खूप छोट्या सर्वेक्षणावर आधारित आहे त्यामुळे ती प्रातिनिधिक असेलच असे नाही किंवा तिचे सामान्यीकरण करता येणार नाही परंतु, निश्चितच समाधान देणारी आहे. 

  • जगभरामध्ये 2000 ते 2013 या दरम्यान अभ्यासक्रमातील शारीरिक शिक्षणाला दिलेला वेळ कसा कमी होत जात आहे हे दर्शवणारा आलेख पुढील प्रमाणे 



प्राथमिक स्तरावर 2000 मध्ये ११६ मिनिटे, 2007 मध्ये १०० मिनिटे  आणि 2013 मध्ये  ९७ मिनिटे वेळ दिला गेला. तर माध्यमिक स्तरावर 2000 मध्ये १४३ मिनिटे, 2007 मध्ये १०२ मिनिटे  आणि 2013 मध्ये  ९९ मिनिटे वेळ दिला गेला.

यावरून असे लक्षात येते की, शारीरिक शिक्षण या विषयासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये दिला जाणारा वेळ हा वर्षागणिक कमी होत आहे. 

विविध सर्वेक्षनावरून असे दिसून आले आहे की, इतर विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बऱ्याचदा शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिकांचा उपयोग केला जातो. या सर्व आकडेवारीवरून आणि  विश्लेषनावरून शारीरिक शिक्षणात कार्य करणाऱ्या सगळ्यांनीच बोध घेऊन पुढील संकल्प करण्याची आवश्यकता आहे.

  1. अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासाठी दिलेल्या तासिकांची नियोजनबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणी करणे.
  2. शारीरिक शिक्षणाच्या तासिकांचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठीच होईल!!! इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नाही याची दक्षता प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाने घ्यावी.
  3. शारीरिक शिक्षणाचा तास हा सर्वसमावेशक असावा जेणेकरून विविध सुदृढता स्तर, कौशल्य स्तर असलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या क्षमतेप्रमाणे शारीरिक हालचाली करण्याची संधी मिळेल 
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६



Sunday, January 10, 2021

एक झपाटलेला: शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक


 भारतीय शिक्षण आणि समाज व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि खेळ हा अत्यंत दुर्लक्षित आणि प्राधान्यक्रम नसलेला असा विषय आहे. सोयी-सुविधांचा अभाव, इतर विषय शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांचा दृष्टिकोन, बदलती शासकीय धोरण अशा एक ना अनेक समस्या सध्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या विषयाला भेडसावत आहेत. असे म्हटले जाते की, "Be a part of answer NOT a question." म्हणजे "उत्तराचा भाग बना, प्रश्नाचा नाही" या वाक्याप्रमाणे काही व्यक्ती आजूबाजूला असलेल्या प्रश्‍नांच्या आणि समस्यांच्या गर्दीत अथवा चर्चेत वेळ न घालवता आपल्या परीने या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींपैकीच एक म्हणजे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या गावांमधील एमजीएम कॉलेजचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची संक्षिप्त सांख्यिकी माहिती पुढीलप्रमाणे 

१. आत्तापर्यंत आंतर महाविद्यालयीन स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांच्या महाविद्यालयातील 302 खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळात प्रतिनिधित्व केले आहे.

२. महाविद्यालयांमध्ये आंतर महाविद्यालयीन स्तरापासून अंतर विद्यापीठ स्तरापर्यंत आत्तापर्यंत 132 स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.

३. आत्तापर्यंत विद्यापीठ, राज्य सरकार आणि  भारत सरकार मार्फत २ कोटी 98 लाख रुपयाचे अनुदान मिळविले आहेे.

४. २०१५ मध्ये  क्रीडा महोत्सव (अश्वमेध) स्पर्धेचे यशस्वी आयोजन ज्यामध्ये 4000 हजार खेळाडू व पाच खेळाचा समावेश होता.

या मधूनच एकूण 3 इनडोअर स्टेडियम, ४ बास्केट बॉल ग्राउंड, ४ हॉलीबॉल ग्राउंड, ४ कबड्डी ग्राउंड, 4 खो खो ग्राउंड, १ नेट बॉल, १ हँडबॉल, १ बॉल बॅडमिंटन आणि २००  मीटरचा ट्रॅक अशा प्रकारच्या सोयीसुविधा सरांनी एमजीएम महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या आहेत. 

या सांख्यिकी माहितीचे वेगळ्या प्रकारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, मनोज रेड्डी सरांची आत्तापर्यंत एकूण 18 वर्षाची सेवा झालेली आहे. या सेवेमध्ये त्यांचे दर वर्षी सरासरी १७ खेळाडू वेगवेगळ्या स्तरावर खेळलेले आहेत, दर वर्षी सरासरी ७ स्पर्धांचे आयोजन केलेले आहे, तर दर वर्षी सरासरी १ मैदानाचा विकास केलेला आहे आणि दर वर्षी सरासरी १६ लाख ५५ हजार इतके अनुदान शासनामार्फत मिळविलेले आहे.

हे सर्व केवळ सांख्यिकी आकडे नाही तर स्पर्धांचे आयोजन असो की, मैदानांचा विकास असो या प्रत्येक बाबींमध्ये गुणवत्ता घसरणार नाही याची काळजी सर नेहमीच घेतात. त्यामुळेच अहमदपूर मध्ये स्पर्धांचे आयोजन असते तेव्हा संपूर्ण गावांमध्ये एक वेगळाच उत्साह, ऊर्जा आणि वातावरण निर्मिती झालेली असते. या स्पर्धा बघण्यासाठी अहमदपूर मध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी उसळते. असाच एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. 2011 यावर्षी एमजीएम महाविद्यालया मध्ये हँडबॉलच्या आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातील विविध विद्यापीठांचे ६५ मुलींचे आणि ७५ मुलांचे  संघ सहभागी होण्यासाठी आले होते. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या सर्व संघांची मिरवणूक संपूर्ण गावा मधून काढण्यात आलेली होती. ही मिरवणूक बघण्यासाठी संपूर्ण गावांमधून मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली होती. प्रत्येक चौकाचौकात खेळाडूंवर पुष्पवृष्टी होत होती, खेळाडूंना स्थानिक लोक उस्फूर्तपणे पुष्पगुच्छ देत होते, हार घालत होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला अहमदपूर मधील हा पाहुणचार म्हणजे अतिशय सुखद अनुभव होता. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशामध्ये हँडबॉल सारख्या खेळालाही इतकी समाजमान्यता निर्माण होण्यामध्ये मनोज रेड्डी यांचा सिंहाचा वाटा आहे. 

याबरोबरच सरांनी चार वर्षे विद्यापीठामध्ये क्रीडा संचालक म्हणून कार्य करताना आणि महाविद्यालयांमध्ये कार्य करताना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले ते पुढीलप्रमाणे

१. विद्यापीठामध्ये स्पर्धा आयोजनांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग केला त्यामुळे खेळाडू, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांमध्ये संवाद आणि समन्वय प्रस्थापित झाला

२. खेळाडूंना स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो हे ओळखून सरांनी प्रत्येक संघासाठी रेल्वेचे आरक्षण करूनच प्रवास करेल याकडे लक्ष पुरविले.

३. वेगवेगळ्या संघांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आणि त्या प्रशिक्षण शिबिरांसाठी भारतातील नामवंत मार्गदर्शकांना निमंत्रित केले. 


या संपूर्ण कार्यामध्ये यशस्वी होण्यामागे मनोज रेड्डी यांची स्वभाव वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये नवीन रुजू झालेल्या शिक्षकांसाठी ही स्वभाववैशिष्ट्ये मार्गदर्शक ठरू शकतील असे वाटते ती पुढील प्रमाणे.

१. कमी बोलणे आणि कृतीवर लक्ष केंद्रित करणे

२. संस्थाचालकांपासून शिपायापर्यंत, गावातील प्रतिष्ठित व्यक्तीपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांशीच मनोज रेड्डी यांचे संबंध आणि नेटवर्किंग अतिशय चांगले आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यामध्ये त्यांना सर्वांचाच पाठिंबा आणि सहकार्य लाभते.

३. कोणतेही कार्य करत असताना ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आवश्यक तो पाठपुरावा (Follow up) करणे हे त्यांचे महत्त्वाचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. 

४. प्रामाणिक, निस्वार्थी आणि विनम्र स्वभावामुळे सगळ्यांचाच विश्वास संपादन केला.

५. उत्तमता (Excellence) आणि गुणवत्ता (Quality) यालाच प्राधान्य देतात 


तळागाळात अशाच झपाटून काम करणाऱ्या, क्रीडा संस्कृती निर्माण करणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांची आज शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला अत्यंत आवश्यकता आहे. 


शरद आहेर 

मो. ९८९००२५२६६ 


Saturday, January 9, 2021

फिनलंड मधील शिक्षण पद्धती आणि भारत 

 फिनलंड मधील शिक्षण पद्धती आणि भारत 

फिनलंड मधील शिक्षण पद्धती ही समस्या निराकरण, उद्योजकता आणि कौशल्य यावर आधारलेले आहे. तर भारतीय शिक्षण पद्धती ही घोकंपट्टी, पुस्तकिपना आणि आशय यावर आधारलेली आहे. प्रा. लीला पाटील यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की, साचेबद्धपणा आणि पुस्तकीपणा हा भारतीय शिक्षणाला लागलेला शाप आहे. खरंतर महात्मा गांधी यांनी 1937 मध्ये त्यांच्या 'नई तालीम' या शिक्षण विचारातून उद्योग केंद्री शिक्षणाचा विचार मांडला होता. परंतु भारतीय धोरणकर्त्यांनी आणि समाजाने हा विचार नाकारला व नई तलीमच्या शाळा बंद पडू लागल्या. म्हणजेच फिनलंडने 1970 नंतर जो दृष्टिकोन अंगीकारला तो भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला होता. 

फिनलंड आणि भारतीय शिक्षणाची तुलना करताना शिक्षकांची गुणवत्ता हा मला कळीचा मुद्दा वाटतो. फिनलंड प्रत्येक शिक्षकाला पाच वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. परंतु भारतामध्ये एक किंवा दोन वर्षाचे शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम आहेत. आणि त्या ठिकाणी चाललेला अभ्यासक्रम हा अत्यंत कालबाह्य आहे. शिक्षण शास्त्र महाविद्यालयांची गुणवत्ता भारतामध्ये अत्यंत खालावलेली आहे असे वाटते. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या 'शोध नव्या युगाचा' या पुस्तकामध्ये तर "शिक्षकांची संख्या आणि गुणवत्ता ही आपले राष्ट्रीय संकट म्हणून घोषित करावे" असे म्हटले आहे.

फिनलंड मधील शिक्षण हे खासगीकरणाकडे कडून सार्वजनिकरनाकडे वाटचाल करत आहे तर, भारतामध्ये याच्या उलट परिस्थिती असून भारताने सर्वजनिकरणाकडून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. भारतीय सरकार शिक्षणातील खासगीकरणाला अनुकूल धोरण आखत आहे. भारतामध्ये सरकारी शाळा या बंद पडत आहेत किंवा त्यामध्ये पालक आपल्या मुले प्रवेश घेत नाहीत आणि खाजगी शिक्षण संस्थांचा बाजार मांडला आहे. 

1970 नंतर फिनलंडने तेथील शिक्षण पद्धतीचे योग्य विश्लेषण केले, नियोजन केले आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली त्यामुळे त्याचे फलित त्यांना सध्या मिळत आहे. परंतु, भारतामध्ये विश्लेषण केले जाते, नियोजन केले जाते, निर्णय घेतले जातात परंतु, शेवटच्या पायरीला म्हणजे अंमलबजावणीला मात्र व्यवस्था कमी पडतो. (नवीन शैक्षणिक धोरण याला अपवाद ठरेल अशी अपेक्षा)

फिनलंड मधील शिक्षण पद्धती मध्ये विद्यार्थी स्वतःचे नियम स्वतः बनवितात. परंतु, भारतामध्ये प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांवर लादली जाते. कुठल्याही निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात नाही. आणि शिस्तीच्या नावाखाली धाक, दडपशाही याचा अतिरेक केला जातो. शिक्षक हा शाळेतील ‘ हुकूमशहा’ सारखा वागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता (Creativity) आणि नाविन्यता (Innovation) याचा विकास होण्यास खूप मर्यादा येतात.

फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा हि भारतीय शिक्षणाची ग्रहीतके आहेत. 

शिक्षण तज्ञ रमेश पानसे सर यांनी असे म्हटले आहे की, ज्ञान देणारी शिक्षण व्यवस्था बंद करून आता विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवायला शिकविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागेल. शिक्षकच फक्त मुलांना शिकवू शकतो हा संकुचित दृष्टिकोन आता मागे पडला आहे. संधी दिली तर मुलं स्वतःसुद्धा शिकतात, परस्परांकडून शिकतात. 

भारतामधील शिक्षणपद्धती मध्ये काही प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शाळा, संस्था, शिक्षक नक्कीच चांगले कार्य करत आहेत परंतु, त्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा नवीन शैक्षणिक धोरणात दूर होतील अशी अशा करूया.


शरद आहेर, 

प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे 

मो. ९८९००२५२६६

sharadaher3@gmail.com


Saturday, December 26, 2020

विद्यार्थी केंद्रित शारीरिक शिक्षणाच्या दिशेने


विद्यार्थी केंद्रित शारीरिक शिक्षणाच्या दिशेने 

एकदा मैदानावर व्यायाम करत असताना शेजारीच बास्केटबॉल मैदानावर एक चिमुकला हातामध्ये बॉल घेऊन बास्केटबॉलच्या रिंग मध्ये टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. परंतु, त्याची उंची, त्याच्या हातातील ताकद आणि बास्केटबॉल पोलची उंची यामध्ये खूप अंतर असल्यामुळे त्याचा बॉल रिंग पर्यंत जात नव्हता. त्यावेळी मनात आले की, सुपरमॅन सारखे जाऊन आपण त्या बास्केटबॉल पोलची उंची कमी करावी जेणेकरून त्या चिमुकल्याचा बॉल बास्केटबॉल च्या रिंग मध्ये जाईल आणि तो आनंदाने उड्या मारील. अशा प्रकारचे अनेक प्रसंग नेहमीच आपल्या आजूबाजूला दिसतात. शारीरिक उपक्रमात, खेळात आणि कौशल्यात यश मिळाल्यानंतर मिळणारा आनंद मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खूप महत्वाचे असते नव्हे ती एक भावनिक गरज असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नाही किंवा सतत अपयश येते तेव्हा आपण ती गोष्ट करण्याचे सोडून देतो. जर आपल्याला सातत्याने अपयश येत असल्यास वाटते की, प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. हीच परिस्थिती शारीरिक शिक्षण पाठात बर्‍याचदा येऊ शकते. एखादे कौशल्य किंवा उपक्रम करताना जर विद्यार्थ्यांना यश आले नाही तर ते निराश होण्याची किंवा सराव थांबवण्याची शक्यता अधिक असते. जर शिक्षकाला असे वाटत असेल की, विद्यार्थ्याने चांगला सराव करावा, सरावात सातत्य आणि प्रेरणा असावी तर विद्यार्थ्याला करत असलेल्या उपक्रमात यश मिळायला हवे. यशस्वितेचा दर (Success rate) जर चांगला असेल तर विद्यार्थी सराव करण्यासाठी प्रेरित होतो. पण संशोधनानुसार नवीन कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा यशस्वितेचा दर हा साधारणपणे 80 %
इतका असावा. उदाहरणार्थ एखादे कौशल्य विद्यार्थ्याने दहा वेळेस केले असता त्याला आठ वेळेस यश मिळाले तर तो सहवास प्रेरित होतो. चांगले कौशल्य प्राप्त करण्यासाठी ूप सार्‍या सरावाची आवश्यकता असते. कौशल्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी अनेक महिने अथवा वर्ष लागू शकता. याविरुद्ध त्यांना तात्काळ निकाल हवे असतात. विद्यार्थ्यांना थोडे जरी अपयश आले तरी त्यांना वाटते की आपण कौशल्य करू शकणार नाही त्यांचा आत्मविश्वास कमी होतो स्व संकल्पना कमी होण्याची शक्यता असत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शारीरिक शिक्षण शिक्षक हे सरावात अशा प्रकारे बदल करतात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेचा दर हा कच्चा असत. असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार सराव देतो, सराव सोपे अवघड क्रमबद्ध क्रमबद्ध वाढवत नेतो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो. तसेच दुसरा बाद मौज बंद करतो जेणेकरून विद्यार्थी सरावात आनंदाने सहभागी होतात व कौशल्यात प्रगती करतात. विद्यार्थ्यांच्या यशाचा दर चांगला लागण्यासाठी काही तंत्र आहेत ती पुढीलप्रमाणे.

1. स्व निश्चित लक्ष्य (self adjusting target)

वेगवेगळ्या खेळामधील थ्रोइंग, कॅचींग  यासारख्या कौशल्यांचा सराव करताना या तंत्राचा चांगला उपयोग होतो. या कौशल्यांचा सराव करताना सर्वसाधारणपणे शिक्षक विशिष्ट असे अंतर निश्चित करून विद्यार्थ्यांना पासिंग, किकिंग यासारख्या कौशल्य करण्यास सांगतात. परंतु शिक्षकाने निश्चित केलेले अंतर हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी योग्य असेलच असे नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता कौशल्य स्तर हा वेगळा असतो त्यामुळे शिक्षकाने निश्चित केलेले अंतर हे काही विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे तर काही विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. त्यासाठी अशा कौशल्यांचा सराव घेताना शिक्षकाने अंतर निश्चित न करता विद्यार्थ्यांना अंतर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यामुळे काही विद्यार्थी लक्ष्यापासून कमी अंतरावर उभे राहतील आणि काही विद्यार्थी लक्ष पासून अधिक अंतरावर उभे राहतील आणि आपापल्या क्षमतेनुसार सराव करते. अशाप्रकारे शारीरिक शिक्षण पाठात काही प्रमाणात विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यास विद्यार्थ्यांच्या यशाचा दर वाढण्यास मदत होईल. 

2. तिरकस रोप तंत्र (Slanty Rope technique)

तिरकस रोप तंत्र हेसुद्धा यशस्वितेचा दर वाढविण्यासाठीचे प्रभावी तंत्र आहे. जागेवरुन लांब उडी जागेवरून उंच उडी रनिंग थ्रोइंग यासारख्या कौशल्यांचा सराव करताना या तंत्राचा उपयोग होतो. यासाठी दोन रोप जमिनीवर ठेवावे एका टोकाला रोप जवळ असेल तर मधील अंतर कमी असेल तर दुसऱ्या टोकाला रोपमधील अंतर अधिक असेल. रोप नसल्यास मैदानावर फक्की ने अथवा कोणाच्या सहाय्याने आखणी केली तरी चालेल. सराव सुरू केल्यानंतर कोणत्या अंतरावरून उडी मारायची किंवा कौशल्य करायचे याचा निर्णय विद्यार्थ्यांवर सोपवायचा. विद्यार्थी आपापल्या क्षमतेप्रमाणे अंतर निश्चित करतील आणि त्या ठिकाणाहून ते कौशल्य करण्याचा प्रयत्न करते. आंतर निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिल्यामुळे विद्यार्थी कमी अंतरावरून कौशल्य करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात यश आल्यानंतर विद्यार्थी ते कौशल्य किंवा उपक्रम करण्यास प्रोत्साहित होतील. 

3. अध्यापनामध्ये निमंत्रण देणे (Teaching by Invitation)

अध्यापनात निमंत्रण म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रकारचा सराव किंवा उपक्रम न देता वेगवेगळे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे उदा. यामध्ये शिक्षक दोन किंवा त्यापेक्षा जास्त सरावकार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवतो व त्यानंतर विद्यार्थी निर्णय घेतात की त्यांच्यासाठी कोणते सराव कार्य योग्य आहे. कारण एकच सराव कार्य सर्व विद्यार्थ्यांना योग्य होईलच असे नाही, वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असतात आणि म्हणून अश्या वेगवेगळ्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे सराव कार्य दिले आणि कोणते सराव कार्य विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे त्यांचा निर्णय विद्यार्थ्यांनाच घेऊ दिला तर विद्यार्थी सरावासाठी निश्चितच प्रोत्साहित होतील. त्यासंदर्भात काही उदाहरणे पुढीलप्रमाणे 
ज्या विद्यार्थ्यांना मॉडिफाइड पुशअप्स करायच्या असतील त्यांनी मॉडिफाइड पुशअप्स करावेत, ज्यांना पूर्ण पुशअप्स करायचे असतील त्यांनी पूर्ण पुशअप्स करावेत.
तुम्हाला सराव जोडीदाराबरोबर करायचा असेल तर त्याच्याबरोबर करा अथवा एकटा करायचा असेल तर एकटा करा  
मला वाटते सर्वांनी किमान २५ सिटअप्स करावेत आणि ज्यांना जास्त करायच्या असतील त्यांनी जास्त करावे 
थोडक्यात सांगायचे म्हणजे विद्यार्थ्यांवर एकच सराव कार्य लादायचे नाही तर, त्यापेक्षा जास्त सराव कार्य विद्यार्थ्यां देणे व कोणता सराव करायचा याचा निर्णय विद्यार्थ्यांना घेऊ देणे. क्षमतेनुसार सरावाचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देणे जे पारंपरिक शारीरिक शिक्षण तासामध्ये साधारणपणे नसते. अध्यापनामध्ये निमंत्रण देताना शिक्षकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे सराव कार्याची एकमेकांशी तुलना करायची नाही किंवा हे सराव कार्य चांगले दुसरे वाईट अशा प्रकारच्या तुलना करू नये. विद्यार्थ्यांना सराव करत असताना यश मिळावे, विद्यार्थ्यांची स्व संकल्पनेचा विकास करण्यासाठी, हालचालींचा आनंद मिळणे आणि सकारात्मक वातावरण निर्मिती करणे हाच वेगवेगळे सराव कार्य देण्यामागचा प्रमुख उद्देश आहे हे शिक्षकाने लक्षात ठेवावे. प्रत्येक उपक्रम सक्तीचा, शिस्तीचा धाक या मानसिकतेमधून बाहेर पडून विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतींचा दैनंदिन पाठात उपयोग करणे सर्वसमावेशक शारीरिक शिक्षणासाठी आवश्यक आहे.   

शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
sharadaher@agashecollege.org


Wednesday, December 16, 2020

शारीरिक साक्षरता काळाची गरज !!!


साक्षरता म्हणजे वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता. भारतामध्ये साक्षरता यावर शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य झालेले आहे आणि चालू आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न होताना दिसत आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये अक्षर (Alphabetical) आणि संख्यात्मक (Numarical) साक्षरतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. परंतु, या साक्षर ते बरोबरच आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे हे सध्या करोना  महामारीमुळे प्रकर्षाने जाणवत आहे. 

शारीरिक साक्षरता म्हणजे काय?

"आयुष्यभरासाठी शारीरिक सक्रिय राहण्याची प्रेरणा, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता, ज्ञान आणि समज असणे  म्हणजे शारीरिक साक्षरता " केवळ व्यायाम करणे किंवा एखादा खेळ खेळणे म्हणजे शारीरिक साक्षरता नसून एखादा खेळ,  उपक्रम किंवा व्यायाम करण्याची क्षमता असणे, व्यायाम, किंवा उपक्रम आत्मविश्वासाने करणे,  जे व्यायाम किंवा उपक्रम  करतो आहोत त्यासंबंधी ज्ञान आणि समज असणे,  व्यायाम, उपक्रम किंवा खेळ खेळण्याची प्रेरणा असणे हे चारही घटक शारीरिक साक्षरतेसाठी महत्त्वाचे आहेत. कारण, हे चारही घटक आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठी महत्वाचे आहे. सर्वसामान्य व्यक्ती व्यायाम अथवा उपक्रम करतो त्यावेळी त्या उपक्रमा बद्दलचे ज्ञान, समज फारशी लक्षात घेत नाही. म्हणजे एखादा व्यायाम का करावा? कसा करावा? किती करावा? त्याचे फायदे -तोटे इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जात नाही. त्यामुळे कालांतराने इजा होणे, थकवा जाणवणे किंवा अपेक्षित परिणाम न मिळणे  यासारखे अनुभव येतात आणि परिणामी व्यायामात खंड पडतो आणि बंद पडतो. म्हणून, व्यायाम/उपक्रम करण्याची  केवळ क्षमता असून उपयोग नाही तर त्या व्यायामाचे/उपक्रमाचे शास्त्रीय ज्ञान आणि समज  असणे महत्वाचे आहे. क्षमता, ज्ञान, आत्मविश्वास आणि प्रेरणा हे वेगवेगळे घटक असूनही त्यांचा एकमेकाशी अतिशय जवळचा संबंध आहे. यातील एकाही घटकाची कमतरता शारीरिक साक्षरतेत बाधा आणू शकते.  शारीरिक साक्षरता विकसित करणे म्हणजे  हालचालीचा आनंद घेता येणे, आत्मविश्वासाने आणि मुक्तपणे हालचाली करता येणे, हालचाल  कशी करायची आणि आपण का हालचाल केली पाहिजे हे जाणून घेणे आणि शारीरिक उपक्रमात  सर्जनशील असणे. शारीरिक साक्षरता ही केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा खेळाडूंसाठी नाही तर ती प्रत्येकासाठी आहे. शारीरिक साक्षरतेत तरुण-वयोवृद्ध, श्री-पुरुष, खेळाडू-खेळाडू नसलेले अशा  प्रत्येकाचा समावेश आहे किंबहुना प्रत्येकाची ती गरज आहे.   शारीरिक साक्षरता हा एक प्रवास आहे. तो कोणत्याही वयात सुरू करता येतो आणि आयुष्यभर चालू असतो. त्यामुळे शारीरिक साक्षर होण्यासाठी कोणतेही वयाची अट नाही. शारीरिक साक्षरता हि गुण (Marks) किंवा स्पर्धा (Competition) यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. कारण, बरेच खेळाडू जोपर्यंत स्पर्धामद्धे सहभागी होतात तोपर्यंतच खेळाचा सराव करतात आणि स्पर्धा संपल्या कि, सराव थांबवितात. शारीरिक साक्षरतेसाठी अशाप्रकारे पार्ट टाईम कार्य अपेक्षित नाही. कारण, आरोग्य किंवा सुदृढता हि राखून, साचून (store) ठेऊ शकत नाही.  संशोधनात असेही दिसून आले आहे की, शारीरिक साक्षरतेशिवाय व्यक्ती शारीरिक उपक्रम  आणि खेळातून माघार घेऊ शकतात. यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक निष्क्रियता आणि अस्वास्थ्य येते.  

शारीरिक साक्षरतेचा विकास आणि प्रसार होण्यासाठी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे 



शारीरिक साक्षरतेचा पाया 

कोणत्याही विषयाच्या अथवा क्षेत्राच्या काही मूलभूत (Fundamantals) गोष्टी असतात, तत्त्वे असतात त्याचप्रमाणे  विविध खेळांची/उपक्रमांची सुद्धा  काही मूलभूत कौशल्य आहेत. ज्याप्रमाणे मराठी भाषा ही  मुळाक्षरंवर आधारलेली आहे, तर इंग्रजी भाषा ही A to Z या अल्फाबेट वर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे खेळामधील मूलभूत कौशल्य म्हणजे सर्व खेळांचा,उपक्रमांचा व हालचालींचा पाया आहे. चालणे, धावणे, उड्या मारणे, लंगडी घालने, थ्रोइंग, कॅचींग, कीकिंग, पुलिंग, पुशिंग, बेंडींग ही सर्व मूलभूत कौशल्य म्हणजे शारीरिक साक्षरतेची बाराखडी म्हणजेच पाया आहे. कुठल्याही विषयात प्रगती साधायची असेल तर त्या विषयाचा पाया मजबूत असणे आवश्यक असते. वर्ष २ ते ७ हा कालखंड मूलभूत कौशल्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. २ ते ७ या कालखंडात मूलभूत कौशल्यांचा विकास जितका चांगला होईल तितके आयुष्यभर सक्रिय राहण्याची शक्यता वाढते, विविध उपक्रम करण्याची क्षमता येते त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे शारीरिक साक्षरतेच्या दिशेने प्रगती करण्यासाठी मुलभूत कौशल्य शिकणे अत्यावश्यक आहे.


मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळांचे महत्व

शाळेमधील मधल्या सुट्टीचे निरीक्षण केले असता विद्यार्थी आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर आनंदाने आणि मनसोक्तपणे मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळ खेळत असतात. परंतु असे खेळ बालपणाबरोबरच लुप्त पावतात. सर्वसाधारणपणे आपल्या समाजामध्ये खेळांकडे स्पर्धात्मक दृष्टिकोनातूनच बघितले जाते. परंतु,  आनंदासाठी खेळ असा दृष्टिकोन निर्माण होणे ही काळाची गरज आहे. कारण,  व्यक्तीला एखादा शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळत असताना आनंद मिळत असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळते. समाजामध्ये मुख्य खेळांना (Major Games) अधिक महत्त्व दिले जाते. म्हणजे ज्याचे विशिष्ट नियम असतात, वेगवेगळ्या स्तरावर ज्या खेळाच्या स्पर्धा होतात असे खेळ. परंतु असंरचित खेळ (Unstructured Games), मॉडिफाइड खेळ  सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. ज्याचे विशिष्ट असे नियम नसतात किंवा वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धाही होत नाही. परंतू, गल्ली बोळांमद्धे,सोसायट्यांमद्धे आणि वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्तपणे अनेक पारंपरिक खेळ खेळत असतात आणि त्यांचा आनंद लुटत असतात. उदा. विटी दांडू, लगोरी इ तसेच विविध खेळ, नृत्य प्रकार वेगवेगळ्या भागात केले जातात. नृत्य हा सुद्धा अनेक व्यक्तींचा आवडता शारीरिक उपक्रम आहे. शारीरिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून असे खेळ महत्त्वाचे आहेत. असे आंतरराष्ट्रिय मार्गदर्शक गोपीचंद यांनी म्हटले आहे. 

शारीरिक शिक्षण शिक्षक आणि पालकांची जबाबदारी 

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध शारीरिक उपक्रम आणि खेळाची ओळख आणि त्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थी त्यामधून त्यांना जे आवडते उपक्रम किंवा खेळ आवडतील ते आयुष्यभर खेळू शकतील. कारण, सर्वांना एकच शारीरिक उपक्रम आवडतो असे नाही तर प्रत्येकाची आवड-निवड, क्षमता वेगळी असते. उदा. चालणे, योगासन, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग वेगवेगळे खेळ खेळणे इत्यादी. तसेच शिक्षकांनी व पालकांनी आपल्या आवडी-निवडी विद्यार्थ्यांवर लादू नये. अन्यथा विद्यार्थी त्या उपक्रमाचा आनंद घेऊ शकणार नाही.  त्यामुळे बालवयात विविध शारीरिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देणे हे शिक्षक आणि पालक या दोघांचीही जबाबदारी आहे.आणि आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठीचा तोच पाया आहे.जेव्हा पालक बालपणात हालचाली करण्यास प्रोत्साहित करतात तेव्हा शारीरिक साक्षरता सुरू होते

सर्वसाधारणपणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयांमध्ये अडचणी येतात अशा विषयाचे विद्यार्थी विशेष क्लासेस लावतात परंतु, सध्या खेळामध्ये जे चांगले विद्यार्थी असतात त्यांना विशेष क्लास लावले जातात आणि त्यांच्यावर अधिक लक्ष दिले जाते. खरं तर ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करताना अडचणी येतात, त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा नसते अशा विद्यार्थ्यांना विशेष क्लासेसची आणि अधिक लक्ष देण्याची गरज असते. विद्यार्थ्याच्या मनात  शारीरिक उपक्रमाबद्दल भीती असेल तर तो आयुष्यभर त्यात भाग घेणार नाही. म्हणून शारीरिक उपक्रम करताना आत्मविश्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शारीरिक साक्षरता हा वैयक्तिक आजीवन प्रवास आहे. शारीरिक साक्षरतेकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहणे आणि कृती करणे भविष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरेल.


शरद आहेर 

सहयोगी प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे 

मो. 9890025266 


Friday, September 4, 2020

मागे वळून पाहताना ........

मागे वळून पाहताना ........ 

सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्या. मी गेल्या 20 वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत आहे. परंतु, शिक्षक म्हणून माझा जन्म  एक-दोन वर्षपूर्वीच झाला असे वाटते. त्याअगोदर मी ऑफिसर, पोलिस यांची भूमिका पार पाडली शिक्षकाची नाही असे वाटते. शिक्षकाला मुलांनी खूप घाबरले पाहिजे, शिक्षकाची मुलांना भीती, धाक, दडपण वाटले  पाहिजे. अशा समजुतीत माझी अनेक वर्ष गेली. ज्या शिक्षकांना विद्यार्थी खूप घाबरतात, जे शिक्षक मारतात तेच चांगले शिक्षक अशी पक्की समजूत होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये या समजुती मध्ये फरक पडत गेला तो पुढीलप्रमाणे.  यामध्ये प्रथम माझा जुना दृष्टीकोण आणि समज आहे आणि त्याच्या समोर यात झालेला बदल दिलेला आहे. 

  1. शिक्षक म्हणजे खूप शिकविणारा → शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करणारा.
  2. ज्याला विद्यार्थी खूप घाबरतात तो चांगला शिक्षक →ज्याला विद्यार्थी अजिबात घाबरत नाही आणि मित्रासारखे वाटतात तो चांगला शिक्षक.
  3. जो विद्यार्थ्यांना मारतो तो चांगला शिक्षक → जो  विद्यार्थ्यांवर प्रेम करतो तो चांगला शिक्षक.
  4. चांगले प्रेझेन्टेशन करणारा, विद्यार्थ्यांना नोट्स लिहून देणारा  →विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अनुभव देणारा, विद्यार्थ्यांशी चर्चा करणारा, स्व अध्ययनाला चालना देणारा 
  5. केवळ पुस्तकी माहितीवर आणि अभ्यासक्रम पूर्ण करणारा  →पुस्तका बाहेरील वास्तविक जीवनाशी निगडित शिकवणारा 
  6. उत्तम बोलणारा  →चांगला शिक्षक उत्तम श्रोता (Good listener) असावा 
  7. आदेश देणारा → विद्यार्थ्यांचे मत विचारात घेणारा
  8. चुकल्यानंतर शिक्षा करणारा → समजून घेणारा 
  9. वर्गात शांतता अपेक्षित करणारा → विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणारा, विद्यार्थ्यांना वर्गात मुक्त हालचालीस वाव देणारा  
  10. घोकंपट्टीवर आणि माहितीवर (Inform) आधारित परीक्षा घेणारा →  कृतीवर आधारित, सर्जनशिलतेला वाव असणारी परीक्षा घेणारा
  11. स्टेजवरून व्याख्यान देणारा → विद्यार्थ्यांमध्ये मिसळून चर्चा करणारा 
  12. व्याख्यान पद्धतीचा, हुकूम पद्धतीचा पुरस्कर्ता → विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कर्ता 
माझ्या शिक्षकाबद्दलचा दृष्टीकोण आणि समज वाढविण्यात शिक्षण तत्व आणि विचार (विनोबा भावे), बखर शिक्षणाची, कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स,शिक्षकांसाठी साने गुरुजी (हेरंभ कुलकर्णी), परिवर्तनशील शिक्षण, प्रवास ध्यासचा आनंद सृजनाचा, अर्थपूर्ण शिक्षणासाठी, शिक्षण देता-घेता (लीला पाटील), नयी तालिम, रचनावादी शिक्षण, शिक्षण आनंदक्षण (रमेश पानसे), शिक्षण क्रांति हीच खरी क्रांती (आचार्य रजनिश) या सर्व पुस्तकांमुळे शक्य झाले. असे म्हणतात की, " शिक्षकाचे कर्तव्य म्हणजे कमीत कमी ज्ञान देणे आणि जास्तीत जास्त विचार करण्यास प्रेरित करणे आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सल्लागार, जोडीदार असावा. संवाद, चर्चा, समजून घेणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यावर अधिक वेळ व्यतीत करणरा असावा."  
शिक्षक होण्यासाठीची पदवी (Degree) घेणे आणि शिक्षकाची समज येणे यात किती फरक आहे हे समजायला मला अनेक वर्ष लागली. आपल्याला ती समज लवकर यावी यासाठी हा प्रयत्न     

Monday, August 10, 2020

वास्तव शारीरिक शिक्षणाचे !

 

वास्तव शारीरिक शिक्षणाचे !

 

काल एका एम.फिल संशोधनाच्या सादरीकरणासाठी उपस्थित होतो. सदर संशोधन हे शाळेमधील शारीरिक शिक्षणाच्या संबंधीचे होते. त्यासाठी संशोधिकेने सातारा शहरांमधील 18 शिक्षकांचे 53 शारीरिक शिक्षण तासाचे निरीक्षण केले होते. संशोधनामधील प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे व अतिशय धक्कादायक होते. ते म्हणजे संशोधिकेने बघितलेल्या 53 शारीरिक शिक्षण तासांपैकी केवळ एक शारीरिक शिक्षणाचा तास नियोजनबद्ध असा होता ज्यामध्ये प्रास्ताविक हालचाली, कौशल्य सराव, विद्यार्थ्यांच्या चुकांची दुरुस्ती, सर्वांना सराव करता येईल इतके साहित्य होते. बाकीच्या 52 शारीरिक शिक्षण तासांमधील शिक्षकांनी कुठलेही नियोजन केलेले नव्हते, काही तासांमध्ये तर शिक्षकच चुकीचे प्रात्यक्षिक दाखवत होते, चुकीची माहिती विद्यार्थ्यांना देत होते, तर काही पाठांमध्ये विद्यार्थी चुकीच्य पद्धतीने व्यायाम करत होते, कौशल्य सराव करत होते परंतु त्यांच्या चुकांची शिक्षक उपस्थित असूनही दुरुस्ती केली जात नव्हती, निरीक्षण केलेल्या 53 तासांपैकी बहुतांश शारीरिक शिक्षण तासांमध्ये शिक्षक केवळ कबड्डी खो-खो यासारखे खेळ घेत होते व शिक्षक केवळ पंचकार्य करत होते, त्या दरम्यान शिक्षक कुठलाही फीडबॅक देत नव्हते, काही तासांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्यास काही विद्यार्थ्यांना बाजूला बसलेले गेलेले होते अशी काही प्रमुख निरीक्षणे व निष्कर्ष या संशोधनामध्ये नोंदविलेली होती. 

हे सर्व  ऐकल्यानंतर  दुःख, निराशा, संताप अशा सगळ्या भावना एकवटून आल्या होत्या. मनामध्ये एकामागून एक अशा अनेक प्रश्नांचा कलह माजलेला होता. पुस्तकांमध्ये अपेक्षित असलेला शारीरिक शिक्षणाचा तास आणि शाळांमध्ये चालू असणारे शारीरिक शिक्षण यातील तफावत प्रकर्षाने जाणवत होती.प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतक्या महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाचे प्रत्यक्ष शाळाशाळांमधून इतकी अनास्था का बरे असेल? हे संशोधन केवळ सातारा शहरापुरतेच मर्यादित होते परंतु शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग व इतर ठिकाणीही शाळाशाळांमधून चाललेले शारीरिक शिक्षण व अपेक्षित असणारे शारीरिक शिक्षण या मधली तफावत खूप मोठी आहे हे मान्य करावाच लागेल. हे सर्व चित्र बदलायचे असेल तर काय बरे करावे लागेल? या सर्व परिस्थितीला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत ? या परिस्थितीचे विश्लेषण करायचे झाले तर अनेक चर्चा रंगतीलही, परिस्थिती बदलायची वाट पाहायची की बदलण्यासाठी प्रयत्न करायचे ? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यामध्ये काहूर करत होते. त्याचवेळी महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील  प्रसंग आठवला. महात्मा गांधीजींचे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले होते परंतु, चांगले गुण मिळवणे वेगळे आणि प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हा मोठा प्रश्न गांधीजींना पडलेला होताआणि ही अडचण त्यांनी आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखवली त्यातील एका मित्राने गांधीजींना इंग्लंडमधील एका मोठ्या नावाजलेल्या वकीलाला भेटण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे गांधीजी त्या वकिलांना भेटायला गेले व त्यांच्याकडे आपली अडचण बोलून दाखवली त्यावेळेस त्यांनी गांधीजींना सांगितले की वकिली करण्यासाठी खूप बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वगैरेची अजिबात आवश्यकता नाही  सामान्य प्रामाणिकपणा आणि कळकळ एवढ्याने तुमचे काम भागेल.
शारीरिक शिक्षण शिक्षकांनाही याचं घटकांची आवश्यकता आहे असे वाटते!!!
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६

Friday, July 24, 2020

प्रवास ध्यासाचा: कै. कॅ. शिवरामपंत दामले

प्रवास ध्यासाचा: कै. कॅ. शिवरामपंत दामले


कै. कॅ. शिवरामपंत दामले उर्फ शिवा काकांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजे 1924 मध्ये महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, त्याचबरोबर कुस्ती, लाठी, मैदानी खेळ हे तरुणांना शिकविणे, त्यासाठी व्यायाम शाळा काढणे समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व नैतिक उन्नतीसाठी सहाय्य करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून शारीरिक शिक्षण हे शास्र आहे अशा छोटेसा तालमीत त्याचा विकास होणे शक्य नाही हे जाणून त्यांनी १९२४ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर कै अण्णासाहेब भोपटकर व कै केळकर यांच्या सहकार्याने  टिळक रोड येथे महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. शिवरामपंत दामले म्हणजे प्रचंड  इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी यांचा योग्य असा मिलाफ असलेलं व्यक्तिमत्व होतं. शारीरिक शिक्षण हे शास्त्र आहे व त्याचे सुसंपन्न असे महाविद्यालय आपण काढलेच पाहिजे असा त्यांचा मानस होता. त्यादृष्टीने त्यांनी १९३८ पासून महाविद्यालयाची परवानगी मिळविण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू केले आणि १९३८ साली सुरू केलेल्या प्रयत्नांना १९७७ मध्ये यश आले. अशा प्रकारे ३९ वर्ष त्यांनी चिकाटीने प्रयत्न करून शारीरिक शिक्षणाचे महाविद्यालय सुरू केले. दरम्यानच्या काळात त्यांना अनंत अडचणी आल्या परंतु, त्यांनी ते डगमगले नाहीत की हरले नाहीत. कारण त्यांचा चिकाटी वरती पूर्ण विश्वास होता. 
त्यांनी काही वर्ष सैन्यामध्ये काम केलेले असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले कि महाराष्ट्रातील मुलांना इंग्रजी चांगले येत नाही. मराठी तरुणांनी नेहमी उच्च ध्येय घ्यावे अशा विचाराने प्रभावित असलेले शिवरामपंत दामलेंनी इंग्रजीचे जागतिक स्तरावरील स्थान जाणून जागतिक बाजारपेठेत व सनदी लष्करी सेवेत यश प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे धाडस केले. आजही ही शाळा एक नामवंत शाळा म्हणून ओळखली जाते. त्यांच्या याच दूरदृष्टीचे फळ म्हणजे आज पोलीस,  सैन्य अशा विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रीय मंडळातील विद्यार्थी उत्तमपणे कार्य करत आहे. आज महाराष्ट्रीय मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व शारीरिक  शिक्षणाचे महाविद्यालय असा मोठा विस्तार झालेला आहे. अशा या शैक्षणिक विस्ताराबरोबरच क्रीडा विस्तारही तितक्याच मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. कुस्ती, मल्लखांब, क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल यासारख्या देशी विदेशी खेळांचे प्रशिक्षण महाराष्ट्रीय मंडळामध्ये दिले जाते. 
आज महाराष्ट्रीय मंडळामध्ये तीन वर्षांपासून तर सत्तर वर्षांपर्यंत अनेक लोक व्यायाम करण्यासाठी व खेळण्यासाठी नियमित  येतात. महाराष्ट्रीय मंडळाने व शिवा काकांनी व्यायामाला  एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणाऱ्या आणि आरोग्याचे संवर्धन करणाऱ्या अनेक पिढ्या शिवा काकांनी आणि महाराष्ट्रीय मंडळाने निर्माण केलेल्या आहेत. आजचा तरुण हा रगेल बनला पाहिजे, बेडर झाला पाहिजे असे शिवा काका नेहमी म्हणत. आजही टिळक रोड आणि गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या  मैदानावर  हजारो युवक युवती व्यायाम करतात, खेळतात आणि आपलं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रीय मंडळा मध्ये पारंपरिक व्यायाम प्रकाराबरोबरच आधुनिक व्यायाम प्रकार व क्रीडा बाबी आजच्या तरुण पिढीला शिकविल्या जातात. शिवरामपंत दामले व महाराष्ट्रीय मंडळ ही फक्त व्यक्ती किंवा संस्था नसून तो एक विचार आहे आणि हा विचार व्यायामाच्या माध्यमातून खेळांच्या माध्यमातून जपला जात आहे. एकीकडे सिमेंटची जंगल उभे रहात असताना महाराष्ट्रीय मंडळाने मैदानाचे संवर्धन करून समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपली कटिबद्ध सिद्ध केलेली आहे. तसेच महाराष्ट्रीय मंडळ म्हणजे नुसती व्यायाम  शाळा नव्हती तर ती एक चळवळ होती, आमचा पोरगा जगाच्या बाजारात खणखणीत नाण्यासारखा वाजला पाहिजे ही शिवा काकांची त्याच्या मागे तळमळ होती आणि त्याच्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. आज शिवरामपंत दामले हे नाव खूपच कमी लोकांना माहित असेल कारण ते प्रसिद्धीसाठी कधीही हपापलेले नव्हते. आपले ध्येय हे समाजहितासाठी जोपासणारे रामदास स्वामींचे कार्य साठवणारे निष्ठावंत कार्यकर्ते होते. शासनाची कुठलीही मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर आणि लोकांचा सहकाऱ्यांवर महाराष्ट्र मंडळ ही संस्था शिक्षण आणि व्यायामाच्या प्रचार आणि प्रसाराचे अतिशय मूलभूत आणि रचनात्मक कार्य समर्थपणे करत आहे.  शिवा काकांचे विचार पुढील काळामध्ये त्यांचे चिरंजीव कै रमेश दामले यांनी, नातू कै. धनंजय दामले व आता तिसऱ्या पिढीतील तरुण तडफदार श्री. रोहन दामले  समर्थपणे पुढे नेत आहेत. एका व्यक्तीने बघितलेले   स्वप्न, त्याची  इच्छाशक्ती व दूरदृष्टी पुढे अनेक पिढ्यांवर कशी परिणाम करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कै. कॅ. शिवरामपंत दामले व महाराष्ट्रीय मंडळ होय.

शरद आहेर  




Friday, May 29, 2020

मिशन 80 टू 60

मिशन 80 टू 60 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत विकसित देश होणार अशा प्रकारचा आशावाद निर्माण केला होता. परंतू, ज्या तरुण पिढीच्या जोरावर त्यांनी हा आशावाद सांगितलं होता त्या तरुण पिढीच्या आरोग्याची स्थिती कशी आहे याचा आढावा घेतला असता पुढील बाबी समोर आल्या. भारत मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जगातील सर्वात जास्त मधुमेही भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहेत. एका सर्वेक्षणानुसार 1990 मध्ये भारतात 26 दशलक्ष इतके मधुमेहाचे रुग्ण होते त्यांची संख्या २०१६ ला ६५ दशलक्ष इतकी झाली तसेच फुफ्फुसांच्या संबंधित रुग्णांची संख्या २८ दशलक्ष होती ती २०१६ मध्ये ५५ दशलक्ष इतकी झाली. दरवर्षी हृदयविकारामुळे सुमारे 1.7 दशलक्ष भारतीयांचे मृत्यू  होतात. ही आकडेवारी गेल्या २५ वर्षात भारतातील आरोग्याची पातळी किती ढासळत आहे याचे चित्र दर्शविते आणि अतिशय चिंताजनक आहे. सध्या समाजामध्ये आढळणारे रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, हृदयाशी संबंधित आजार हे सर्व आजार शारीरिक अक्रियाशीलतेशी (Physical Inactivity) संबंधित आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वच घटकांना समाजामध्ये शारीरिक क्रियाशीलते विषयी जागृती निर्माण करण्यासाठी मोठे योगदान द्यावे लागणार आहे. शारीरिक क्रियाशीलते विषयीचा प्रसार व पाया शालेय विद्यार्थ्यांमध्ये भक्कम होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. असे म्हणतात की, Not All children can become elite athlete but all children can enjoy the benefits of a Physical Active lifestyle” त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना शारीरिक क्रियाशीलता किती करायला हव्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शिका दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.

5 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्रियाशीलता पातळी किती असावी यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या  शिफारशी 

तरुण व्यक्तीसाठी, शारीरिक क्रियाशीलतेमध्ये खेळ, क्रीडा, मनोरंजन, वाहतूक, दैनंदिन कामेशारीरिक शिक्षण किंवा नियोजित व्यायाम यांचा समावेश होतो.

  • 5 ते 17 वयोगटातील मुले आणि तरुणांनी दररोज कमीतकमी 60 मिनिटे  साधारण ते  तीव्र  शारीरिक हालचाली  केल्या पाहिजेत.
  •  60 मिनिटांपेक्षा जास्त शारीरिक हालचाली अधिक आरोग्य लाभ प्रदान करतात.
  •  दैनंदिन शारीरिक हालचाली बहुतांश एरोबिक असाव्यात. आठवड्यातून कमीतकमी 3 वेळा स्नायू आणि हाडांना बळकटी देणार्‍या तीव्र हालचालींचा  समावेश केला पाहिजे.
  •  या शिफारसी लिंग, वांशिक किंवा उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता सर्व तरुणांसाठी लागू आहेत.
  • निष्क्रिय तरूणांसाठी, वरती संगीतलेले  लक्ष्य साध्य करण्यासाठी सुरूवातीला थोड्या प्रमाणात शारीरिक हालचालींसह प्रारंभ करावा आणि हळूहळू कालावधी, वारंवारता आणि तीव्रता वाढविणे योग्य आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जर तरुण सध्या कोणतीही शारीरिक हालचाल करीत नसतील तर शिफारस केलेल्या पातळीपेक्षा कमी प्रमाणात केल्याने काहीही न केल्यापेक्षा अधिक फायदा होईल.

 परंतु एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, 5  ते 17 वयोगटातील 80 % विद्यार्थी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या 60 मि. शारीरिक हालचाली करत नाही. अशा या 80 % विद्यार्थ्यांना 60 मिनिट शारीरिक हालचाली करण्यासाठी विविध उपक्रम घेणे व प्रोत्साहन देणे हे शारीरिक शिक्षण शिक्षकांपुढील आव्हान आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक मिशन 80-60  असे दिलेले आहे. या 80 % विद्यार्थ्यांना अधिकाधिक क्रियाशील करण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक शाळेमध्ये काय करू शकतो याबद्दलचे विविध संशोधनाचे निष्कर्ष आणि जगभरातील काही शाळांमध्ये चालू असलेल्या कल्पना पुढे मांडत आहे. शारीरिक क्रियाशीलतेची पातळी वाढवण्यासाठी केवळ शारीरिक शिक्षणाचे तास पुरेसे होणार नाही तर त्यासाठी विविध उपाययोजना शाळेमध्ये कराव्या लागतील

  1. शारीरिक शिक्षण तासाची प्रभावी अंमलबजावणी: विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशिलतेच्या  पातळीत वाढ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षणाचा तास. शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये विद्यार्थी किती वेळ क्रियाशील असतात यासंबंधी काही संशोधन झालेले आहेत आणि त्यानुसार ३० मि. पैकी केवळ 9 ते 11 मि. विद्यार्थी क्रियाशील असतात. ही वेळ समाधानकारक नाही. शारीरिक शिक्षण तासांमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचालींची पातळी वाढविण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना काही पर्याय (Options)
    उपलब्ध करून द्यायला हवे कारण सर्व विद्यार्थ्यांना एकच खेळ किंवा उपक्रम आवडेल असे नाही, त्याचबरोबर विद्यार्थ्यां संख्येच्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देणे,  त्यासाठी मॉडिफाइड साहित्य तयार करणे, शारीरिक शिक्षण तासातील उपक्रम छोट्या छोट्या गटात घेणे.शारीरिक शिक्षणाचे तास इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी न देणे आणि शारीरिक शिक्षण तासासाठी मिळालेल्या 30 मिनिटाचे जास्तीत जास्त हालचाली होण्यासाठी उपयोग करून घेणे हे महत्त्वाचे ध्येय असायला हवे.
  2.  ऍक्टिव्ह ब्रेक (Active break): शाळेच्या वेळापत्रकात 5 ते 10 मिनिटाचा ऍक्टिव्ह ब्रेक जर दिला तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ व्हायला मदत होईल.या ब्रेक मध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे तर मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ऑफिस कर्मचारी अशा सर्वांनीच विविध प्रकारच्या शारीरिक हालचाली कराव्या. या ब्रेकमध्ये कोणत्या हालचाली कराव्यात, कशा कराव्यात याबद्दल आपापल्या स्थानिक पातळीवर विचार विनिमय करून निर्णय घ्यावा.त्यामुळे शाळेतील एकूण वातावरण शारीरिक क्रियाशीलतेला पूरक होईल.
  3. मधली सुट्टी: शालेय वेळापत्रका20 ते 30 मिनिटाची मधली सुट्टी असते. निरीक्षण केले असता या सुट्टीमध्ये विद्यार्थी सर्वसाधारणपणे पाच ते दहा मिनिटात आपला डबा खातात व उरलेल्या वेळेत मित्रांबरोबर खेळतात. अशाप्रकारे मधल्या सुट्टीतील दहा ते पंधरा मिनिट सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त सक्रिय राहण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, साहित्य उपलब्ध करून दिल्यास या वेळेचा विद्यार्थ्यांची क्रियाशीलता वाढविण्यास हातभार लागेल. मधल्या सुट्टीत शिक्षकाने शिकविणे अपेक्षित नाही तर विद्यार्थ्यांना हव्या त्या अनौपचारिक उपक्रम, खेळ खेळू द्यावे. अशाप्रकारचे मधल्या सुट्टीतील उपक्रम बऱ्याच शाळेमध्ये चालू आहे.
  4. शाळेनंतरचे उपक्रम: शाळा सुटल्यानंतर किंवा भरावयाच्या अगोदर एक तास शारीरिक उपक्रमांसाठी राखीव ठेवल्यास ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे असे विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये विविध खेळांचे विशेष प्रशिक्षण, शारीरिक सुदृढता उपक्रम, तालबद्ध हलचाली, योगासन, स्केटिंग, मनोरंजनात्मक खेळ, अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव करता येईल.
  5. आंतरकूल स्पर्धा कार्यक्रम: शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक खेळाचा अनुभव देण्यासाठी शाळेमध्ये कुल पद्धती अवलंबिल्यास फायदेशीर ठरते. आठवड्यातून एक दिवस अंतरकूल स्पर्धा घेतल्यास शाळेमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण होण्यास मदत होते. तसेच अशा स्पर्धांमधून वेगवेगळ्या खेळातील टॅलेंटेड विद्यार्थी समजतात.
  6.  अंतरविषय दृष्टिकोन (Interdisciplinary Approach ): मराठी, शास्त्र, गणित, भूगोल यासारख्या विषयांमधील काही घटक हे शारीरिक हालचालींवर आधारित घेतल्यास विद्यार्थ्यांची हालचालीची पातळी वाढते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. वर्गात बसून शिकण्यापेक्षा कृतीयुक्त शिक्षण हे विद्यार्थ्यांना आवडते व ते परिणामकारक असते. त्यामुळे इतर विषयाच्या शिक्षकांशी चर्चा करून अशा प्रकारचे अध्यापन झाल्यास ते शारीरिक शिक्षण विषयासाठी पूरक असेल.
  7. सक्रिय वाहतूक: शहरांमध्ये बऱ्याचदा विद्यार्थी शाळेमध्ये बस, रिक्षा किंवा व्हॅन या मध्ये येतात. परंतु शाळेमध्ये चालत अथवा सायकलवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांच्या क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ होईल.

  1. गृहपाठ: शाळेत वर्गामध्ये बसून विद्यार्थी कंटाळलेले असतात. घरी गेल्यानंतर मनसोक्त खेळण्याचे स्वप्न बाळगतात परंतु विविध विषयाच्या गृहपाठ अथवा ट्युशन मुळे त्यांना हे स्वप्न भंग पावते. त्यामुळे इतर विषयाचा सा गृहपाठ असतो तसाच शारीरिक शिक्षण विषयाचा ही ग्रहपाठ दिल्यास विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करण्यास प्रेरणा मिळेल व त्यांच्या हालचालीच्या पातळीत वाढ होईल.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलते मध्ये वाढ होण्यासाठी आणि दिवसभरात किमान 60 मिनिट क्रियाशील राहण्यासाठी विविध उपाययोजना करणे आरोग्यदायी पिढी असण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि भविष्यात तरुण पिढीचे आरोग्य सुधारल्यास शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून समाजासाठी आपले महत्त्वाचे योगदान राहील.

 शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
मो. 9890025266

 


Friday, May 22, 2020

सीनियर ज्युनियर दरी शारीरिक शिक्षणाला मारक !

 

सीनियर ज्युनियर दरी शारीरिक शिक्षणाला मारक !

ंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील बीपीएड चे विद्यार्थी दरवर्षी इंटर्नशिपसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये दीड महिन्यासाठी जातात. परत आल्यानंतर त्यांच्याशी बोलताना सर्व विद्यार्थी एक गोष्ट आवर्जून सांगतात ती म्हणजे शाळेतील सीनियर शिक्षक काम करू देत नव्हते.  दोनच दिवसापूर्वी एका शाळेतील शिक्षकांचाही मला फोन आला व ते शाळेत काय काय उपक्रम राबवत आहे याबद्दल सांगू लागले परंतु, त्याचबरोबर सीनियर शिक्षक प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कशी आडकाठी घालतात याची खंत व्यक्त केली. अशा प्रकारची मानसिकता/ वाद सगळीकडेच असतात परंतु, याचे प्रमाण अधिकच वाढले असल्याचे जाणवत आहे. म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी लिहीत आहे.  

अलीकडच्या काळामध्ये शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, अध्यापन शैली, साहित्य, उपक्रम व एकूणच दृष्टिकोनमध्ये विविध बदल झालेले आहेत. हे नवीन बदल नवीन शिक्षक शाळेमध्ये राबविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतू, हे बदल जुन्या पिढीतील शिक्षकांना माहीत नसल्यामुळे दोन पिढ्यांमधील ज्ञानात दरी निर्माण झाल्यामुळे हे वाद होत असावेत. परंतु, त्यामुळे नवीन शिक्षकांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच समाजात, शासन स्तरावर, शाळेमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाला अनेक अडथळ्यांना आणि समस्यांना सामोरे जावे लागत असताना आपल्याच जुन्या आणि नव्या पिढीतील शिक्षकांमधील अशी दरी शारीरिक शिक्षण विषयासाठी मारक आहे. शारीरिक शिक्षणातील नवनवीन उपक्रम, कल्पना शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणे हे विषयाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. नवीन शिक्षकांना पाठिंबा, प्रेरणा जर मिळाली तर ते अधिक जोरदार काम करतील. अन्यथा सीनियर शिक्षकांच्या अशा मानसिकतेमुळे नवीन शिक्षक उत्साह थोड्याच कालावधीत कमी होतो परिणामी शारीरिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो व शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होते. माझी सीनियर शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करावे, पाठिंबा द्यावा, प्रोत्साहित करावे आणि शारीरिक शिक्षणातील नवीन प्रवाहा बरोबर जुळवून घ्यावे व नवीन शिक्षकांनी ही   सीनियर शिक्षकांना विश्वासात घ्यावे व त्यांचा मान राखला जाईल याची काळजी घ्यावी.  शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी दोघांचेही योगदान, सहयोग  मोलाचे असणार आहे

भिंती उंचावत आहेत... पण विश्वासाची उंची कमी होत आहे?

 भिंती उंचावत आहेत... पण विश्वासाची उंची कमी होत आहे?  जगाच्या इतिहासात चीनची महान भिंत ही मानवी बुद्धिमत्तेचे आणि सामर्थ्याचे प्र...