मी शिक्षक होण्यासाठीची पदवी घेतली म्हणजे मी शिक्षक झालो का? संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षक म्हणून जी प्रतिमा तयार होते ती एक वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाने पुसली जाऊ शकते का? माझ्या बाबतीत म्हणाल तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. १९९७ शारीरिक शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर मला आहे वाटायचे की, शिक्षक होणे म्हणजे "विद्यार्थ्यांना शिकविणे". त्यातच मला बी पी एड महाविद्यालयात नोकरी लागली त्यामुळे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यासाठी खूप कष्ट करायचो आणि वर्गात जाऊन तयार केलेले प्रेझेंटेशन घशाला कोरड पडेपर्यंत बोलायचे आणि विद्यार्थ्यांना काहीही माहीत नव्हते ते मी!!! त्यांना शिकविले या तोऱ्यात बाहेर यायचे. एक वेगळाच अहंकार असायचा त्या शिकविण्याचा. वर्गात कुणी बोलायचे नाही, चर्चा नाही, लिहून घ्या म्हटले की विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचे आणि ऐका म्हटले की ऐकायचे. मागे वळून बघिल्यानंतर मी असे का करत असेन यावर विचार केल्यानंतर असे वाटते की, माझ्या मनात गेल्या अनेक वर्षात शिक्षकाची जी प्रतिमा तयार झालेली होती तिचा तर परिणाम नाही हा? माझ्या बाबतीत याचे उत्तर हो आहे. शिक्षक प्रशिक्षण घेत असताना अध्यापनाच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला होता परंतू तो परीक्षे पुरताच होता, शिक्षक हा Facilitator असतो हे सुद्धा अभ्यासले होते पण त्याचे उपयोजन प्रत्यक्ष व्यवहारात करू शकत नव्हतो कारण शिक्षक कसा असतो याचे गेले कित्येक वर्ष जे निरीक्षण केले होते, जे अनुभवले होते त्याचे पारडे ही एक वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षा जास्त होते.
एकदा असेच शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आणि लीला पाटील यांची पुस्तक वाचताना माझ्या शिक्षक म्हणून असणाऱ्या प्रतिमांना, विचारांना एकामागून एक धक्के बसत होते त्यातच लीला पाटील यांच्या एका पुस्तकात International Education Council यांचे एक वाक्य वाचनात आले ते पुढीलप्रमाणे
The teachers duty is to less and less inculcate knowledge and more and more to encourage thinking. He will have to become more and more advisor partner to talk to, someone to helps to seek out conflicting argument rather than handing out readymade truths. He will have to devote more time and energy for creative activities, interaction, discussion, stimulation, understanding, encouragement. (शिक्षकाचे कर्तव्य अधिकाधिक ज्ञान देण्याचे न राहता विचारप्रवृत्तीला चालना देण्याचे असले पाहिजे. त्याने सल्लागार व संवाद करणारा भागीदार बनले पाहिजे — जो विद्यार्थ्यांना ठराविक सत्ये देण्याऐवजी विरोधाभासी मतांची उत्तरे शोधण्यात मदत करतो. त्याने अधिक वेळ आणि ऊर्जा सृजनशील उपक्रम, परस्परसंवाद, चर्चा, प्रेरणा, समज आणि प्रोत्साहन यासाठी दिली पाहिजे)
आजच्या बदलत्या शैक्षणिक प्रक्रियेत शिक्षकाची पारंपरिक भूमिका बदलत चालली आहे. पूर्वी शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात माहिती भरणारा असा समज होता. मात्र वरील वाक्याचा गाभा असा सांगतो की, आता शिक्षकांचे काम केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित नसावे, तर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची सवय आणि क्षमता विकसित केली पाहिजे.
शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत एक सल्लागार किंवा सहप्रवासी होण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. त्याने विद्यार्थ्यांना तयार उत्तरं देण्याऐवजी वेगवेगळे विचार, परस्परविरोधी मते, प्रश्न यांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि सृजनशीलता (Creativity) विकसित होते.
शिक्षकाला अधिकाधिक वेळ संवाद, सर्जनशील उपक्रम, चर्चासत्रं, प्रोत्साहन यासाठी द्यावा लागेल. शिक्षकाची भूमिका आता ज्ञानाचा एकमेव स्त्रोत न राहता विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक व्हावे लागेल.
जे कृष्णमूर्ती म्हणतात की, आजचे शिक्षण "हाऊ टू थिंक हे शिकवत नाही तर व्हॉट टू थिंक" हे शिकविते.
हे वाक्य वाचल्यानंतर माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, विचारांचे काहूर माजले, परत परत ते वाक्य वाचत होतो आणि आपण काही चुकीचं तर वाचत नाही ना याची खात्री करून घेत होतो कारण गेली अनेक वर्ष माझ्या शिक्षक म्हणून सर्व कृती याच्या विरुद्धच होत्या.
म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी शिक्षक म्हणून जी भूमिका पार पाडत होतो तिचे आकलन मला झालेलेच नव्हते!!! यासंबंधी भारतातील शिक्षण तज्ञ अरविंदो यांचेही एक वाक्य वाचनात आले ते असे “THE FIRST principle of true teaching is that nothing can be taught. The teacher is not an instructor or taskmaster, he is a helper and a guide. His business is to suggest and not to impose. He does not actually train the pupil’s mind, he only shows him how to perfect his instruments of knowledge and helps and encourages him in the process.(खऱ्या अध्यापनाचा पहिला सिद्धांत असा आहे की काहीही शिकवता येत नाही. शिक्षक हा आदेश देणारा किंवा काम करवून घेणारा नसून, तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. त्याचे काम शिकवण्यावर बळ देणे नसून, केवळ सूचना देणे असते. तो विद्यार्थ्याच्या मनाला प्रत्यक्ष प्रशिक्षित करत नाही, तर केवळ ज्ञानाची साधने विकसित कशी करायची हे दाखवतो आणि त्या प्रक्रियेत त्याला मदत व प्रोत्साहन देतो)
हे दोन्ही वाक्य शिक्षकाची भूमिका नेमकी काय असावी याचे स्पष्टीकरण करणारी आहे.
मला आठवते की, दंगल हा सिनेमा करायच्या अगोदर अमीर खान याने मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल केले होते, कुस्तीचे खरे प्रशिक्षण घेतले, विविध तंत्रे शिकली, कुस्तीपटूंप्रमाणे चालणे, बोलणे, चाल-ढाल आत्मसात केली, त्याने खऱ्या महावीर सिंग फोगाट यांची भेट घेतली, त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला, त्यांच्या मुलींसोबत संवाद साधला,हरियाणवी बोलीभाषा शिकण्यासाठी खास प्रशिक्षक घेतले. अमीर खान प्रमाणेच अनेक हीरो,हिरोईन भूमिका प्रभावी करता यावी यासाठी त्यावर बरेच संशोधन करतात, वाचन करतात. वरील संदर्भ शिक्षकाच्या बाबतीत योग्य होईल की नाही माहीत नाही परंतु भूमिकेची स्पष्टता येण्यासाठी एकीकडे इतके प्रयत्न केले जातात आणि शिक्षक म्हणून माझे नेमके काम काय? विविध तज्ञांची यासंबंधी काय विचार आहे? शिक्षणात भरीव आणि रचनात्मक कार्य केलेले शिक्षक कोणते? त्यांनी की काम केले? काय काम केले? जगभरातील
२१ व्या शतकातील शिक्षक हा "Stage on the Stage" (मंचावर उभा राहून भाषण देणारा) नसून "Guide on the Side" (विद्यार्थ्यांच्या शेजारी राहून त्यांना दिशा दाखवणारा) असावा.
शिक्षक शिक्षण देतो आणि विद्यार्थी ते घेतो अशाप्रकारचा भेद आता राहिलेला नाही कारण, शिक्षण ही कुणी कुणाला द्यायची वस्तू नाही ती आपली आपण आत्मसात करायची गोष्ट आहे. फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं ही समजूत, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही हा विचार, विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत हा दंडक, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा. शिक्षणातील ही सारी गृहीतकं बदलत आहेत.
शिक्षण आणि शिक्षक याविषयीच्या सखोल आकलनासाठी विनोबा भावेंचे शिक्षण तत्व आणि विचार हे पुस्तक शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी लिहिलेले नयी तालीम, तसेच ज्यांनी कोल्हापूर येथे सृजन आनंद ही प्रायोगिक शाळा सुरू केली अशा लीला पाटील यांनी लिहिलेली शिक्षण घेता-देता, शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेले बखर शिक्षणाची,शिक्षकांसाठी साने गुरूजी, कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कुल, दापोली येथे अनेक वर्षापासून प्रायोगिक शाळा चालविणाऱ्या शिक्षण तज्ञ रेणू दांडेकर यांची लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन केल्यामुळे शिक्षण आणि शिक्षक यासंबंधीच्या आपल्या धारना बदलत जातात हे दररोज अनुभवत आहे.












