*क्रीडाराष्ट्र होण्यासाठी पायाभरणी हवी.........*
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची नुकतीच सांगता झाली. भारताला मिळालेल्या ६ पदकांची संख्या जरी मर्यादित असली तरी एकूण ऑलिम्पिक मध्ये भारताची कामगिरी समाधानकारकच म्हणावे लागेल. कारण सहा खेळाडू असे होते जे चौथ्या क्रमांकावर राहिले. काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडने एका वृत्तपत्रास मुलाखत दिली त्यावेळेस त्याला
प्रश्न विचारण्यात आले की, 140 कोटी लोकसंख्येचा देश केवळ मोजकेच ऑलिम्पिक पदक विजेते तयार करू शकला आहे (खरं तर हा प्रत्येक भारतीयाला चार वर्षानंतर पडणारा प्रश्न आहे). ते बदलण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल असे तुम्हाला वाटते? त्यावेळेस राहुल द्रविड म्हणाला की, अव्वल क्रीडा राष्ट्रांपैकी एक होण्यासाठी, आपण प्रथम शारीरिकदृष्ट्या सक्रिय राष्ट्र (Physically Active Nation) बनणे आवश्यक आहे. आपण एक समाज म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आणि वयोगटातील सहभाग वाढवणे आवश्यक आहे. खेळ ही पदके जिंकण्यापलीकडे आहे आणि ही मानसिकता समाजात तयार झाली पाहिजे. या वाक्याला पुष्टी देणाऱ्या एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, भारतातील 80 % विद्यार्थी दिवसाला 60 मि. शारीरिक हालचाली करत नाही.तसेच भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हा कधीही प्राधान्याचा विषय नव्हता आणि नाही. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वृध्दींगत होत जाते असा नैसर्गिक नियम आहे त्याप्रमाणे शासनाच्या आणि शिक्षणाच्या प्राधान्यक्रमामध्ये जेव्हा आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि खेळ हा विषय येईल तेव्हा पदकांची चर्चा आणि विश्लेषण करायला हवे. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेते होणे हा एक दीर्घकालीन आणि पद्धतशीर प्रक्रियेचा परिणाम असतो. परंतू आपण प्रक्रियेपेक्षा (Process) परिणामावर (Product) अधिक लक्ष केंद्रित करतो. आपण आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वतः मैदानावर जाऊन व्यायाम आणि खेळ खेळतो का ? आपल्या पाल्याला खेळण्यासाठी वेळ आणि प्रोत्साहन देतो का? याचा एक भारतीय म्हणून आपण विचार नव्हे तर कृती करायला हवी.
खेळाडुंची गळती (Dropout) एक आव्हान: ज्याप्रमाणे भारतीय शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात गळती होते आणि विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून देतात त्याचप्रमाणे खेळामध्ये आहे. सर्वच स्तरावरील स्पर्धांचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की १२ वर्षाखालील व 14 वर्षाखालील गटांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या खूप मोठी आहे त्या प्रमाणात १६ वर्षाखालील व 19 वर्षाखालील वयोगटात खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत जाते. अनेक विद्यार्थ्यांमध्ये खेळाची प्रतिभा मोठ्या प्रमाणात असतानाही १० वी आणि १२ वी परीक्षांना असणाऱ्या अनन्य साधारण महत्त्वामुळे अनेक खेळाडूंचे खेळातील करिअर सुरू होण्याअगोदरच संपते.इयत्ता १० वी आणि १२ वी नंतर खेळ सोडून देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण, अभ्यासातील बुध्दीमत्ता श्रेष्ठ आणि क्रीडेतील बुध्दीमत्ता कनिष्ठ समजली जाते. यामध्ये स्वतःहून खेळ सोडणाऱ्यांची संख्या नगण्य असते परंतू पालकांच्या आग्रहा खातर अथवा इच्छेखातर खेळ सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भारतातील क्रीडा प्रतिभा सुरुवातीच्या काळातच लुप्त होते. प्रतिभावान खेळाडूंचा ड्रॉप आऊट रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी पालकांमधील जागरूकता वाढणे महत्वाचे आहे. कारण, पदक विजेते खेळाडू घडण्याच्या प्रक्रियेतील पालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व देणाऱ्या सामाजिक रेट्यामध्ये आपल्या पाल्याला खेळायला सपोर्ट करणे खूप आव्हानात्मक परंतू महत्त्वाचे आहे.माझ्या माहितीतील काही पालक आहे जे आपल्या पाल्याला परिस्थिती नसतांनाही खूप सपोर्ट करत आहे परंतू त्यांची संख्या खूप मोजकी आहे. सध्याच्या काळात उच्च क्रीडा कार्यमनासाठी फिटनेस ट्रेनर, आहार, फिजिओ या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात आणि त्या बऱ्याच खर्चिक असतात त्यामुळे पालकांचा सपोर्ट हा कळीचा मुद्दा ठरतो.
शालेय स्तरावरील पायाभरणी महत्वाची: २०२२ मध्ये ‘असर’ या अहवालात आलेल्या निष्कर्षावरून असे आढळले की, भारतातील एकूण शासकीय शाळांमधील बहुतांश शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकच नाही. महाराष्ट्राचा विचार केल्यास केवळ ८ % शाळेत शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहे. हि अतिशय धक्कादायक बाब आहे. जर शारीरिक शिक्षण शिक्षकच नसतील तर शाळेतील विद्यार्थी खेळात कसे सहभागी होतील? लाखो नव्हे तर शासकीय शाळेत शिक्षण घेणाऱ्या करोडो विद्यार्थी हे खेळापासून वंचित राहतात याला जबाबदार कोण? तात्पुरत्या लोकप्रियतेसाठी पदक विजेत्या खेळाडूंना करोडोची बक्षिसे देण्यात गैर काहीच नाही परंतू असे पदक विजेते त्यांचा प्रवास जेथे सुरू करतात अशा शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच करायची नाही हा शासनाचा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? ऑलिंपिक पदक जिंकणे ही बहुस्थरीय प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ दहीहंडीच्या विविध थरांमध्ये सर्वात वरचा थर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळणारे खेळाडू आणि सर्वात खालचा थर म्हणजे शालेय स्तरावरील शारीरिक शिक्षण आणि खेळ. विद्यार्थ्यांची खेळाबद्दलची धारणा, आवड-निवड निश्चित करणारा आणि निर्माण करणारा कालखंड हा विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे खेळाबद्दलचे अनुभव असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत विविध खेळाच्या संधी मिळणे, सकारात्मक अनुभव मिळणे हे खेळातील करिअरच्या दृष्टीने पायाभरणी असते. शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या नियुक्त्या करणे आणि मूलभूत क्रीडा सोयीसुविधा निर्माण केल्यास अनेक पदक विजेते त्यांचा प्रवास सुरू करू शकतील याची जाणीव शासनाला कधी होणार? शाळेमध्ये खेळांसाठी पूरक वातावरण असेल, विद्यार्थ्यांना खेळण्याच्या विविध संधी मिळाल्या तर विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग निश्चित वाढेल. याबरोबरच शाळेत शारीरिक शिक्षणाला सध्या आठवड्याला दोन ते तीन इतकेच तास दिले जातात
युनेस्कोच्या शारीरिक शिक्षण धोरणानुसार माध्यमिक शाळेत एका आठवड्यात शारीरिक शिक्षणासाठी किमान 180 मिनिटे द्यायला हवीत परंतू भारतात सर्वसाधारणपणे आठवड्याला ९० ते १२० मिनिटे इतकाच वेळ दिला जातो. याशिवाय शारीरिक शिक्षणाचा तास इतर विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देखील वापरला जातो. हे चित्र बदलायला हवे आणि शालेय शारीरिक शिक्षणाकडे सर्वांनीच गांभीर्याने बघायला हवे.
आशेचा किरण: गेल्या काही वर्षापासून सुरू केलेल्या खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहे. पदक विजेत्यांना चांगले पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात, ज्याठिकाणी या स्पर्धा होतात तेथे चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण होत आहे. तसेच टॉप्स (Target Olympic Podium Scheme) योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सर्व प्रकारचा सपोर्ट दिला जात आहे ही स्वागतार्ह बाब आहे. त्याचबरोबर विविध खेळांच्या लीग भारतात सुरू झाल्या आहे त्यामुळे उभरत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळत आहे,आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांना सरकारी नोकरीमध्ये घेतले जात आहे. या काही आशादायी बाबी दिसत आहे.
आधुनिक ऑलिम्पिकचे जनक पिएर डी कुबर्टिन म्हणायचे की,‘‘जेव्हा देशातील बहुसंख्य नागरिकांना खेळ ही मूलभूत गरज असल्याची जाणीव होईल, तेव्हाच त्या देशाला क्रीडाराष्ट्र म्हणून संबोधता येईल,’’ २०३६ च्या ऑलम्पिक स्पर्धांचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी भारतात सुरू आहे तोपर्यंत तरी भारत एक क्रीडा राष्ट्र म्हणून पुढे येईल का?
डॉ. शरद आहेर
प्राध्यापक, महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे