Thursday, March 17, 2022

लिहितं होऊ या!

 तीन-चार वर्षांपूर्वी "शिक्षकांसाठी साने गुरुजी" हे हेरंभ कुलकर्णी यांचे पुस्तक वाचत होतो. या पुस्तकात साने गुरुजी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूबद्दल सविस्तर विवेचन केलेले आहे. सानेगुरुजी सर्वांनाच एक संवेदनशील शिक्षक म्हणून परिचित आहे. त्याचबरोबर साहित्यिक म्हणून साने गुरुजीचे कार्य खूप मोठे आहे आणि ते या पुस्तकात सविस्तर मांडलेले आहे जे अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातील एका पानावर मी जे वाचलं त्याने मला खूप अंतर्मुख केले, प्रेरित केले आणि माझ्या धारणा त्यामुळे बदलून गेल्या.




ते म्हणजे "As you write personal and personal it becomes universal and universal". या अर्थाने आपण जितके आपले व्यक्तिगत अनुभव मांडत राहू तितके ते जगाला आपले वाटत असतात. लेखन म्हणजे अशी काही अशक्यप्राय गोष्ट नाही. आपणही सहज लिहू शकतो, असा साधारण आशय या पानावर होता. त्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला होता. तितक्यातच मी माझ्या मुलीला स्पर्धेसाठी एका शाळेमध्ये घेऊन गेलो. त्या ठिकाणी मला खूप चांगला अनुभव आला किंबहुना मी भारावून गेलो होतो. पुस्तकातील या ओळी माझ्या डोक्यात घर करून राहिलेल्या होत्याच. त्या ठिकाणी मी लगेच ते अनुभव मोबाईलवर लिहून काढले जसं सुचेल तसे लिहित गेलो. त्या क्षणी जे अनुभवले, ज्या भावना मनात येत होत्या त्या लिहित गेलो. लिहून झाल्यानंतर मन खूप हलक वाटत होतं. जणूकाही खूप जवळच्या मित्राला तो अनुभव सांगितला होता. असं म्हणतात ना ! की, लेखन म्हणजे संवाद असतो पेनाचा कागदाशी आणि स्वतःचा स्वतःशी हा अनुभव मी प्रथमच घेत होतो. लिहिलेला अनुभव मी व्हॉट्स ॲपवर शेअर केला. काहींनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मला या अनुभवाने आत्मविशवास दिला की, मी पण लिहू शकतो. त्यानंतर मी सुचेल ते लिहित आहे, आलेले अनुभव लिहित आहे. मला वाटायचं आपण फक्त खेळू शकतो,व्यायाम करू शकतो पण लेखन हा आपला प्रांत नाही. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या बहुतांश व्यक्तींना साधारणपणे असाच न्यूनगंड असतो किंबहुना तसे वातावरण, प्रेरणा नसतात. तोत्तोचान, टू सर विथ लव्ह, टीचर ही पुस्तकांत शिक्षकांनी आपले वैयक्तिक अनुभव अत्यंत सहज भाषेत माडले आणि आज ही पुस्तकं जगप्रसिद्ध आहे. आपण सर्वच दैनंदिन जीवनात विविध अनुभव घेतो, काही घटना, प्रसंग घडतात हे आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला असं वाटतं की, आपल्या अनुभवात काय विशेष आहे? हे अनुभव सर्वच घेतात.पण असं नसतं. आपले अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी असू शकतील. 

आज शेती, उद्योग, शिक्षण तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांमध्ये विपुल आणि सकस असे साहित्य उपलब्ध आहे. परंतू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात असे साहित्य उपलब्ध नाही याची खंत वाटते. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात जे काही साहित्य उपलब्ध आहेत ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहचतच नाही. विनोबा म्हणतात की,विज्ञान जोपर्यंत मातृभाषेतून मिळत नाही तोपर्यंत ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. हे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रासाठी पूर्णपणे लागू होते कारण, शारीरिक शिक्षणाचे विपुल साहित्य इंग्रजीत उपलब्ध आहे परंतु ते मराठीत नसल्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहतचत नाही. विनोबा पुढे म्हणतात की, सुशिक्षित लोक आपल्या भाषेत विज्ञान नाही अशी ओरड करतात त्याऐवजी विज्ञान आपल्या भाषेत आणण्यास काहीतरी योगदान करावे. इंग्रजीत चांगली पुस्तके आहेत ती सर्व आपल्या भाषेत आणली पाहिजेत. परंतु यासंबंधी कोणी विचारच करत नाहीत. खरे पाहता ज्यांनी स्वतः इंग्रजीचे ज्ञान मिळविले त्यांनी व्रत घेतले पाहिजे की मी मरण्यापूर्वी एका चांगल्या इंग्रजी पुस्तकाचा माझ्या मातृभाषेत अनुवाद करीन. असा अनुवाद केल्याशिवाय मला मारण्याचा अधिकार नाही. 

असे म्हणतात की,‘एखादा प्रश्न जर सुटायचा असेल तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते त्यामुळे तो प्रश्न सुटायला मदत होते.’ म्हणूनच मनापासून वाटते की, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी चांगले साहित्य निर्माण होणे, लेखक आणि वाचकांची एक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. चला तर लिहितं होऊ या! व्यक्त होऊ या!


संदर्भ

शिक्षकांसाठी साने गुरुजी. हेरंब कुलकर्णी

ज्ञान ते सांगतो पुन्हा. विनोबा भावे



'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...