Saturday, December 26, 2020

विद्यार्थी केंद्रित शारीरिक शिक्षणाच्या दिशेने


विद्यार्थी केंद्रित शारीरिक शिक्षणाच्या दिशेने 

एकदा मैदानावर व्यायाम करत असताना शेजारीच बास्केटबॉल मैदानावर एक चिमुकला हातामध्ये बॉल घेऊन बास्केटबॉलच्या रिंग मध्ये टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. परंतु, त्याची उंची, त्याच्या हातातील ताकद आणि बास्केटबॉल पोलची उंची यामध्ये खूप अंतर असल्यामुळे त्याचा बॉल रिंग पर्यंत जात नव्हता. त्यावेळी मनात आले की, सुपरमॅन सारखे जाऊन आपण त्या बास्केटबॉल पोलची उंची कमी करावी जेणेकरून त्या चिमुकल्याचा बॉल बास्केटबॉल च्या रिंग मध्ये जाईल आणि तो आनंदाने उड्या मारील. अशा प्रकारचे अनेक प्रसंग नेहमीच आपल्या आजूबाजूला दिसतात. शारीरिक उपक्रमात, खेळात आणि कौशल्यात यश मिळाल्यानंतर मिळणारा आनंद मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खूप महत्वाचे असते नव्हे ती एक भावनिक गरज असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नाही किंवा सतत अपयश येते तेव्हा आपण ती गोष्ट करण्याचे सोडून देतो. जर आपल्याला सातत्याने अपयश येत असल्यास वाटते की, प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. हीच परिस्थिती शारीरिक शिक्षण पाठात बर्‍याचदा येऊ शकते. एखादे कौशल्य किंवा उपक्रम करताना जर विद्यार्थ्यांना यश आले नाही तर ते निराश होण्याची किंवा सराव थांबवण्याची शक्यता अधिक असते. जर शिक्षकाला असे वाटत असेल की, विद्यार्थ्याने चांगला सराव करावा, सरावात सातत्य आणि प्रेरणा असावी तर विद्यार्थ्याला करत असलेल्या उपक्रमात यश मिळायला हवे. यशस्वितेचा दर (Success rate) जर चांगला असेल तर विद्यार्थी सराव करण्यासाठी प्रेरित होतो. पण संशोधनानुसार नवीन कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा यशस्वितेचा दर हा साधारणपणे 80 %
इतका असावा. उदाहरणार्थ एखादे कौशल्य विद्यार्थ्याने दहा वेळेस केले असता त्याला आठ वेळेस यश मिळाले तर तो सहवास प्रेरित होतो. चांगले कौशल्य प्राप्त करण्यासाठी ूप सार्‍या सरावाची आवश्यकता असते. कौशल्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी अनेक महिने अथवा वर्ष लागू शकता. याविरुद्ध त्यांना तात्काळ निकाल हवे असतात. विद्यार्थ्यांना थोडे जरी अपयश आले तरी त्यांना वाटते की आपण कौशल्य करू शकणार नाही त्यांचा आत्मविश्वास कमी होतो स्व संकल्पना कमी होण्याची शक्यता असत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शारीरिक शिक्षण शिक्षक हे सरावात अशा प्रकारे बदल करतात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेचा दर हा कच्चा असत. असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार सराव देतो, सराव सोपे अवघड क्रमबद्ध क्रमबद्ध वाढवत नेतो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो. तसेच दुसरा बाद मौज बंद करतो जेणेकरून विद्यार्थी सरावात आनंदाने सहभागी होतात व कौशल्यात प्रगती करतात. विद्यार्थ्यांच्या यशाचा दर चांगला लागण्यासाठी काही तंत्र आहेत ती पुढीलप्रमाणे.

1. स्व निश्चित लक्ष्य (self adjusting target)

वेगवेगळ्या खेळामधील थ्रोइंग, कॅचींग  यासारख्या कौशल्यांचा सराव करताना या तंत्राचा चांगला उपयोग होतो. या कौशल्यांचा सराव करताना सर्वसाधारणपणे शिक्षक विशिष्ट असे अंतर निश्चित करून विद्यार्थ्यांना पासिंग, किकिंग यासारख्या कौशल्य करण्यास सांगतात. परंतु शिक्षकाने निश्चित केलेले अंतर हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी योग्य असेलच असे नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता कौशल्य स्तर हा वेगळा असतो त्यामुळे शिक्षकाने निश्चित केलेले अंतर हे काही विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे तर काही विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. त्यासाठी अशा कौशल्यांचा सराव घेताना शिक्षकाने अंतर निश्चित न करता विद्यार्थ्यांना अंतर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यामुळे काही विद्यार्थी लक्ष्यापासून कमी अंतरावर उभे राहतील आणि काही विद्यार्थी लक्ष पासून अधिक अंतरावर उभे राहतील आणि आपापल्या क्षमतेनुसार सराव करते. अशाप्रकारे शारीरिक शिक्षण पाठात काही प्रमाणात विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यास विद्यार्थ्यांच्या यशाचा दर वाढण्यास मदत होईल. 

2. तिरकस रोप तंत्र (Slanty Rope technique)

तिरकस रोप तंत्र हेसुद्धा यशस्वितेचा दर वाढविण्यासाठीचे प्रभावी तंत्र आहे. जागेवरुन लांब उडी जागेवरून उंच उडी रनिंग थ्रोइंग यासारख्या कौशल्यांचा सराव करताना या तंत्राचा उपयोग होतो. यासाठी दोन रोप जमिनीवर ठेवावे एका टोकाला रोप जवळ असेल तर मधील अंतर कमी असेल तर दुसऱ्या टोकाला रोपमधील अंतर अधिक असेल. रोप नसल्यास मैदानावर फक्की ने अथवा कोणाच्या सहाय्याने आखणी केली तरी चालेल. सराव सुरू केल्यानंतर कोणत्या अंतरावरून उडी मारायची किंवा कौशल्य करायचे याचा निर्णय विद्यार्थ्यांवर सोपवायचा. विद्यार्थी आपापल्या क्षमतेप्रमाणे अंतर निश्चित करतील आणि त्या ठिकाणाहून ते कौशल्य करण्याचा प्रयत्न करते. आंतर निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिल्यामुळे विद्यार्थी कमी अंतरावरून कौशल्य करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात यश आल्यानंतर विद्यार्थी ते कौशल्य किंवा उपक्रम करण्यास प्रोत्साहित होतील. 

3. अध्यापनामध्ये निमंत्रण देणे (Teaching by Invitation)

अध्यापनात निमंत्रण म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रकारचा सराव किंवा उपक्रम न देता वेगवेगळे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे उदा. यामध्ये शिक्षक दोन किंवा त्यापेक्षा जास्त सरावकार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवतो व त्यानंतर विद्यार्थी निर्णय घेतात की त्यांच्यासाठी कोणते सराव कार्य योग्य आहे. कारण एकच सराव कार्य सर्व विद्यार्थ्यांना योग्य होईलच असे नाही, वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असतात आणि म्हणून अश्या वेगवेगळ्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे सराव कार्य दिले आणि कोणते सराव कार्य विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे त्यांचा निर्णय विद्यार्थ्यांनाच घेऊ दिला तर विद्यार्थी सरावासाठी निश्चितच प्रोत्साहित होतील. त्यासंदर्भात काही उदाहरणे पुढीलप्रमाणे 
ज्या विद्यार्थ्यांना मॉडिफाइड पुशअप्स करायच्या असतील त्यांनी मॉडिफाइड पुशअप्स करावेत, ज्यांना पूर्ण पुशअप्स करायचे असतील त्यांनी पूर्ण पुशअप्स करावेत.
तुम्हाला सराव जोडीदाराबरोबर करायचा असेल तर त्याच्याबरोबर करा अथवा एकटा करायचा असेल तर एकटा करा  
मला वाटते सर्वांनी किमान २५ सिटअप्स करावेत आणि ज्यांना जास्त करायच्या असतील त्यांनी जास्त करावे 
थोडक्यात सांगायचे म्हणजे विद्यार्थ्यांवर एकच सराव कार्य लादायचे नाही तर, त्यापेक्षा जास्त सराव कार्य विद्यार्थ्यां देणे व कोणता सराव करायचा याचा निर्णय विद्यार्थ्यांना घेऊ देणे. क्षमतेनुसार सरावाचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देणे जे पारंपरिक शारीरिक शिक्षण तासामध्ये साधारणपणे नसते. अध्यापनामध्ये निमंत्रण देताना शिक्षकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे सराव कार्याची एकमेकांशी तुलना करायची नाही किंवा हे सराव कार्य चांगले दुसरे वाईट अशा प्रकारच्या तुलना करू नये. विद्यार्थ्यांना सराव करत असताना यश मिळावे, विद्यार्थ्यांची स्व संकल्पनेचा विकास करण्यासाठी, हालचालींचा आनंद मिळणे आणि सकारात्मक वातावरण निर्मिती करणे हाच वेगवेगळे सराव कार्य देण्यामागचा प्रमुख उद्देश आहे हे शिक्षकाने लक्षात ठेवावे. प्रत्येक उपक्रम सक्तीचा, शिस्तीचा धाक या मानसिकतेमधून बाहेर पडून विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतींचा दैनंदिन पाठात उपयोग करणे सर्वसमावेशक शारीरिक शिक्षणासाठी आवश्यक आहे.   

शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
sharadaher@agashecollege.org


Wednesday, December 16, 2020

शारीरिक साक्षरता काळाची गरज !!!


साक्षरता म्हणजे वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता. भारतामध्ये साक्षरता यावर शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य झालेले आहे आणि चालू आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न होताना दिसत आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये अक्षर (Alphabetical) आणि संख्यात्मक (Numarical) साक्षरतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. परंतु, या साक्षर ते बरोबरच आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे हे सध्या करोना  महामारीमुळे प्रकर्षाने जाणवत आहे. 

शारीरिक साक्षरता म्हणजे काय?

"आयुष्यभरासाठी शारीरिक सक्रिय राहण्याची प्रेरणा, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता, ज्ञान आणि समज असणे  म्हणजे शारीरिक साक्षरता " केवळ व्यायाम करणे किंवा एखादा खेळ खेळणे म्हणजे शारीरिक साक्षरता नसून एखादा खेळ,  उपक्रम किंवा व्यायाम करण्याची क्षमता असणे, व्यायाम, किंवा उपक्रम आत्मविश्वासाने करणे,  जे व्यायाम किंवा उपक्रम  करतो आहोत त्यासंबंधी ज्ञान आणि समज असणे,  व्यायाम, उपक्रम किंवा खेळ खेळण्याची प्रेरणा असणे हे चारही घटक शारीरिक साक्षरतेसाठी महत्त्वाचे आहेत. कारण, हे चारही घटक आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठी महत्वाचे आहे. सर्वसामान्य व्यक्ती व्यायाम अथवा उपक्रम करतो त्यावेळी त्या उपक्रमा बद्दलचे ज्ञान, समज फारशी लक्षात घेत नाही. म्हणजे एखादा व्यायाम का करावा? कसा करावा? किती करावा? त्याचे फायदे -तोटे इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जात नाही. त्यामुळे कालांतराने इजा होणे, थकवा जाणवणे किंवा अपेक्षित परिणाम न मिळणे  यासारखे अनुभव येतात आणि परिणामी व्यायामात खंड पडतो आणि बंद पडतो. म्हणून, व्यायाम/उपक्रम करण्याची  केवळ क्षमता असून उपयोग नाही तर त्या व्यायामाचे/उपक्रमाचे शास्त्रीय ज्ञान आणि समज  असणे महत्वाचे आहे. क्षमता, ज्ञान, आत्मविश्वास आणि प्रेरणा हे वेगवेगळे घटक असूनही त्यांचा एकमेकाशी अतिशय जवळचा संबंध आहे. यातील एकाही घटकाची कमतरता शारीरिक साक्षरतेत बाधा आणू शकते.  शारीरिक साक्षरता विकसित करणे म्हणजे  हालचालीचा आनंद घेता येणे, आत्मविश्वासाने आणि मुक्तपणे हालचाली करता येणे, हालचाल  कशी करायची आणि आपण का हालचाल केली पाहिजे हे जाणून घेणे आणि शारीरिक उपक्रमात  सर्जनशील असणे. शारीरिक साक्षरता ही केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा खेळाडूंसाठी नाही तर ती प्रत्येकासाठी आहे. शारीरिक साक्षरतेत तरुण-वयोवृद्ध, श्री-पुरुष, खेळाडू-खेळाडू नसलेले अशा  प्रत्येकाचा समावेश आहे किंबहुना प्रत्येकाची ती गरज आहे.   शारीरिक साक्षरता हा एक प्रवास आहे. तो कोणत्याही वयात सुरू करता येतो आणि आयुष्यभर चालू असतो. त्यामुळे शारीरिक साक्षर होण्यासाठी कोणतेही वयाची अट नाही. शारीरिक साक्षरता हि गुण (Marks) किंवा स्पर्धा (Competition) यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. कारण, बरेच खेळाडू जोपर्यंत स्पर्धामद्धे सहभागी होतात तोपर्यंतच खेळाचा सराव करतात आणि स्पर्धा संपल्या कि, सराव थांबवितात. शारीरिक साक्षरतेसाठी अशाप्रकारे पार्ट टाईम कार्य अपेक्षित नाही. कारण, आरोग्य किंवा सुदृढता हि राखून, साचून (store) ठेऊ शकत नाही.  संशोधनात असेही दिसून आले आहे की, शारीरिक साक्षरतेशिवाय व्यक्ती शारीरिक उपक्रम  आणि खेळातून माघार घेऊ शकतात. यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक निष्क्रियता आणि अस्वास्थ्य येते.  

शारीरिक साक्षरतेचा विकास आणि प्रसार होण्यासाठी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे 



शारीरिक साक्षरतेचा पाया 

कोणत्याही विषयाच्या अथवा क्षेत्राच्या काही मूलभूत (Fundamantals) गोष्टी असतात, तत्त्वे असतात त्याचप्रमाणे  विविध खेळांची/उपक्रमांची सुद्धा  काही मूलभूत कौशल्य आहेत. ज्याप्रमाणे मराठी भाषा ही  मुळाक्षरंवर आधारलेली आहे, तर इंग्रजी भाषा ही A to Z या अल्फाबेट वर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे खेळामधील मूलभूत कौशल्य म्हणजे सर्व खेळांचा,उपक्रमांचा व हालचालींचा पाया आहे. चालणे, धावणे, उड्या मारणे, लंगडी घालने, थ्रोइंग, कॅचींग, कीकिंग, पुलिंग, पुशिंग, बेंडींग ही सर्व मूलभूत कौशल्य म्हणजे शारीरिक साक्षरतेची बाराखडी म्हणजेच पाया आहे. कुठल्याही विषयात प्रगती साधायची असेल तर त्या विषयाचा पाया मजबूत असणे आवश्यक असते. वर्ष २ ते ७ हा कालखंड मूलभूत कौशल्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. २ ते ७ या कालखंडात मूलभूत कौशल्यांचा विकास जितका चांगला होईल तितके आयुष्यभर सक्रिय राहण्याची शक्यता वाढते, विविध उपक्रम करण्याची क्षमता येते त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे शारीरिक साक्षरतेच्या दिशेने प्रगती करण्यासाठी मुलभूत कौशल्य शिकणे अत्यावश्यक आहे.


मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळांचे महत्व

शाळेमधील मधल्या सुट्टीचे निरीक्षण केले असता विद्यार्थी आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर आनंदाने आणि मनसोक्तपणे मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळ खेळत असतात. परंतु असे खेळ बालपणाबरोबरच लुप्त पावतात. सर्वसाधारणपणे आपल्या समाजामध्ये खेळांकडे स्पर्धात्मक दृष्टिकोनातूनच बघितले जाते. परंतु,  आनंदासाठी खेळ असा दृष्टिकोन निर्माण होणे ही काळाची गरज आहे. कारण,  व्यक्तीला एखादा शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळत असताना आनंद मिळत असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळते. समाजामध्ये मुख्य खेळांना (Major Games) अधिक महत्त्व दिले जाते. म्हणजे ज्याचे विशिष्ट नियम असतात, वेगवेगळ्या स्तरावर ज्या खेळाच्या स्पर्धा होतात असे खेळ. परंतु असंरचित खेळ (Unstructured Games), मॉडिफाइड खेळ  सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. ज्याचे विशिष्ट असे नियम नसतात किंवा वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धाही होत नाही. परंतू, गल्ली बोळांमद्धे,सोसायट्यांमद्धे आणि वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्तपणे अनेक पारंपरिक खेळ खेळत असतात आणि त्यांचा आनंद लुटत असतात. उदा. विटी दांडू, लगोरी इ तसेच विविध खेळ, नृत्य प्रकार वेगवेगळ्या भागात केले जातात. नृत्य हा सुद्धा अनेक व्यक्तींचा आवडता शारीरिक उपक्रम आहे. शारीरिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून असे खेळ महत्त्वाचे आहेत. असे आंतरराष्ट्रिय मार्गदर्शक गोपीचंद यांनी म्हटले आहे. 

शारीरिक शिक्षण शिक्षक आणि पालकांची जबाबदारी 

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध शारीरिक उपक्रम आणि खेळाची ओळख आणि त्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थी त्यामधून त्यांना जे आवडते उपक्रम किंवा खेळ आवडतील ते आयुष्यभर खेळू शकतील. कारण, सर्वांना एकच शारीरिक उपक्रम आवडतो असे नाही तर प्रत्येकाची आवड-निवड, क्षमता वेगळी असते. उदा. चालणे, योगासन, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग वेगवेगळे खेळ खेळणे इत्यादी. तसेच शिक्षकांनी व पालकांनी आपल्या आवडी-निवडी विद्यार्थ्यांवर लादू नये. अन्यथा विद्यार्थी त्या उपक्रमाचा आनंद घेऊ शकणार नाही.  त्यामुळे बालवयात विविध शारीरिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देणे हे शिक्षक आणि पालक या दोघांचीही जबाबदारी आहे.आणि आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठीचा तोच पाया आहे.जेव्हा पालक बालपणात हालचाली करण्यास प्रोत्साहित करतात तेव्हा शारीरिक साक्षरता सुरू होते

सर्वसाधारणपणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयांमध्ये अडचणी येतात अशा विषयाचे विद्यार्थी विशेष क्लासेस लावतात परंतु, सध्या खेळामध्ये जे चांगले विद्यार्थी असतात त्यांना विशेष क्लास लावले जातात आणि त्यांच्यावर अधिक लक्ष दिले जाते. खरं तर ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करताना अडचणी येतात, त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा नसते अशा विद्यार्थ्यांना विशेष क्लासेसची आणि अधिक लक्ष देण्याची गरज असते. विद्यार्थ्याच्या मनात  शारीरिक उपक्रमाबद्दल भीती असेल तर तो आयुष्यभर त्यात भाग घेणार नाही. म्हणून शारीरिक उपक्रम करताना आत्मविश्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शारीरिक साक्षरता हा वैयक्तिक आजीवन प्रवास आहे. शारीरिक साक्षरतेकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहणे आणि कृती करणे भविष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरेल.


शरद आहेर 

सहयोगी प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे 

मो. 9890025266 


'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...